संतापजनक ! सरकारने विम्याची रक्कम म्हणून शेतकर्‍याला दिला एक रुपया

पोलिसनामा ऑनलाईन – नुकसानभरपाई म्हणून शेतकर्‍यांना अगदीच किरकोळ रक्कम मध्य प्रदेशमधील सरकारकडून देण्यात आल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. बैतुल जिल्ह्यातील एका शेतकर्‍याच्या खात्यावर तर नुकसानभरपाई म्हणून अवघा एक रुपया सरकारने जमा केला आहे. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पीक विमा योजनेअंतर्गत सरकारने 22 लाख शेतकर्‍यांना नुकसानभरपाई दिल्याचा दावा केला आहे. मात्र, झालेले नुकसान आणि देण्यात आलेली रक्कम यामध्ये मोठा फरक असल्याचा दावा शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. बैतुलमधील पुरणलाल या शेतकर्‍याला पिकविम्याअंतर्गत केवळ एका रुपयाची नुकसानभरपाई मिळाली आहे. पुरणलालचे अडीच एकरवरील 1 लाख रुपयांचे पिक उद्धवस्त झाल्यानंतर सरकारने त्याला विम्याची रक्कम म्हणून एक रुपया दिला आहे. याच जिल्ह्यातील इतर दोन शेतकर्‍यांना 70 रुपये आणि 92 रुपये अशी किरकोळ रक्कम नुकसानभरपाई म्हणून देण्यात आली आहे. पिकविम्याची एवढ्या कमी प्रमाणात नुकसानभरपाई देण्यांसंदर्भात कृषी विभागाकडे चौकशी केली असता अधिकार्‍यांनी यासंदर्भात माहिती देण्यास नकार दिला. कोरोनामुळे आधीच आर्थिक फटका बसला असून त्यात अशापद्धतीची वागणूक यंत्रणांकडून दिली जात असल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.