काय सांगता ! होय, घरी पोहचण्यासाठी ‘त्यानं’ लढवली शक्कल, लाखो रूपयांचा 25 टन कांदा खरेदी करून मुंबईहून पोहचला अलहाबादला

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे अनेकांची घरी जाण्यासाठी धडपड सुरू आहे. यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. अशाचप्रकारे मुंबईतून अलहाबादला जाण्यासाठी लॉकडाउन मध्ये अडकलेल्या एका चालकाने चक्क 25 टन कांदा खरेदी केला. त्यानंतर कांदा ट्रकमध्ये भरून रस्ते मार्गाने हा व्यक्ती थेट आपल्या गावी पोहचला आहे. प्रेममुर्ती पांडे असे त्याचे नाव आहे.

पांडे मुंबई विमानतळावर कामाला असून लॉकडाउनमध्येही मुळ गावी जाण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. लॉकडाउनचा पहिला टप्पा त्यांनी मुंबईतच काढला. मात्र नंतर पुन्हा लॉकडाउन वाढवण्यात आल्याने हा मार्ग पत्कारला असल्याचे त्यांनी सांगितले. पांडे म्हणाले, अंधेरी पूर्वमधील आझाद नगरमध्ये मी जिथे राहत होतो तो भाग कोरोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक होता. तर, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बस, रेल्वे व विमानसेवा थांबण्यात आलेली होती. या परिस्थिती मला दिसून आले की, सरकारने एक मार्ग खुला ठेवला आहे. तो म्हणजे अत्यावश्यक सेवा म्हणून फळ व भाज्या आदींच्या वाहतुकीला शिथिलता देण्यात आलेली आहे. हे पाहून सर्वप्रथम तब्बल 1 हजार 300 किलो टरबुज खरेदी केले. 17 एप्रिल रोजी किमान 200 किलोमीटर दूर असलेल्या नाशिकजवळील पिंपळगाव येथे जाण्यासाठी एक मिनी ट्रक भाड्याने घेतला. नंतर जवळपास 10 हजार रुपयांचे टरबुज खरेदी केले . त्यानंतर पिंपळगावमधील उत्तम दर्जाच्या कांदा बाजाराचा अभ्यास करुन 2 लाख 32 हजार रुपयांमध्ये 25 हजार 520 किलो कांदा खरेदी केला. जो की 9 रुपये 10 पैसे प्रतिकिलो पडला. त्यानंतर 77 हजार 500 रुपये भाडे ठरवून पुन्हा एक ट्रक घेतला. 1 हजार 200 किलोमीटर दूर असलेल्या अलहाबादला जाण्यासाठी 20 एप्रिल रोजी हा कांदा ट्रकमध्ये भरला. यानंतर जेव्हा ते 23 एप्रिल रोजी अलहाबादला पोहचले तेव्हा त्यांनी मालाची विक्री करण्यासाठी थेट शहरातील मुंडेरा ही ठोक बाजारपेठ गाठली असल्याचे त्यांनी सांगितले.