अण्णांमुळे सत्तेत आलेले त्यांनाच विसरले

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे जे सत्तेत आले, तेच आता अण्णांना विसरले आहेत, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राळेगणसिद्धीत प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला. त्यांनी आज राळेगणमध्ये येऊन अण्णांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तसेच आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती अतिशय खालावत चालली आहे. आठ फेब्रुवारी पर्यंत मागण्या मान्य न केल्यास केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार परत केला जाईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान आज सकाळी मनसेप्रमुख राज ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर दाखल झाले त्यांनी अण्णांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तसेच आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
ते म्हणाले की, अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे केंद्रातील भाजप सरकार सत्तेवर आलेले आहे. त्यावेळी त्यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. अण्णांमुळे सत्तेवर येऊनही ते आज अण्णांनाच विसरून गेले आहेत.