अमृता फडणवीस यांच्या ’या’ ट्वीटचा रोख कोणाकडे ?, राजकीय वर्तुळात चर्चा

पोलीसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 8 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावरील टीकेबद्दल शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी खुलासा केल्यानंतर ते टीकेच्या रडारवर आलेत. खुलासा करताना त्यांनी वापरलेल्या ’नॉटी’ शब्दावरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही याच शब्दाचा उल्लेख करत एक ट्वीट केलंय. त्यांचा रोख संजय राऊत यांच्याकडं आहे, असं बोललं जातंय.

मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केयाने अभिनेत्री कंगना राणावत ही वादात अडकलीय. कंगना रणावतच्या या वक्तव्याविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगनाला आपल्या राज्यात निघून जा, असा सल्ला दिला होता. मात्र, कंगनाने त्यांना आव्हान दिले आणि मुंबईत येणारच, अडवून दाखवा, असे म्हणाली. त्यामुळं संतापलेल्या राऊत यांनी तिच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. संजय राऊत हे कंगनाला ’हरामखोर’ म्हणाले होते. त्यावरून प्रचंड गदारोळ झालाय. संजय राऊत यांनी कंगना रणावतची आणि महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केलीय. त्यामुळं संजय राऊत यांनी ’हरामखोर’ शब्दासंदर्भात खुलासा केला. मला कंगना रणावतला ’नॉटी’ आणि ’बेईमान’ म्हणायचं होतं, असं त्यांनी म्हंटलंय.संजय राऊत यांनी केलेल्या या खुलाशावरून त्यांची खिल्ली उडवली जातेय.

तर, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांना ’नॉटी बॉय’ म्हटलं होतं. अमृता फडणवीस यांनीही एक ट्वीट केलंय. ’आम्हाला वाटलं नव्हतं त्यापेक्षा जास्त ते नॉटी निघाले,’ असं अमृता फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अमृता यांनी थेट कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा हा टोला संजय राऊत यांच्यासाठी होता, असं बोललं जातंय. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत कंगनाचं समर्थन केलं होतं.