ग्रामपंचायत निवडणूक : ’दादा, मी नदीवर कपडे धुवायला आलेय’; निवडणूक जिंकलेल्या पल्लवीची ‘बात’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन –  महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा अजून खाली बसलेला नाही. आम्हीच कशी बाजी मारली, आपली ताकद कशी वाढली, याची गणितं राजकीय पक्षांचे नेते मांडताहेत. काही गावांत अजूनही विजयाचं सेलिब्रेशन आणि पराभवाचं चिंतन सुरूय. त्याचवेळी, लोकशाहीची एक वेगळी बाजू, एक आगळं रूप कोल्हापूर जिल्ह्यातील शित्तूर-वारुण गावात दिसलीय. ग्रामपंचायत निवडणुकीत पल्लवी मोहन महिंदकर ह्या विजयी झाल्या. 22 व्या वर्षी निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरून विजयाची पताका फडकवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करत त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, ’दादा, मी वारणा नदीवर कपडे धुवायला आलीय’, असं म्हणत त्यांनी हातचं काम बाजूला ठेवून आपल्या राजकारणातील प्रवेशाची गोष्ट सांगितली.

वारणा खोर्‍यातील डोंगरकपारीत शित्तूर वारुण हे गाव आहे. लोकसंख्या साधारणत: पाच हजार आहे. चांदोली धरणाच्या पायथ्याशी वसलेलं हे गाव. कुठलाही राजकीय वारसा नसताना या गावातून पल्लवी महिंदकर यांनी निवडणूक लढवलीय. किंबहुना, त्यांना ती लढवावी लागलीय.

यावेळी पल्लवी म्हणाल्या, ’दोन वर्षांपूर्वी माझं लग्न झालं. पती पदवीधर आहेत. पण, गावात नोकरी नसल्याने मुंबईत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. कोरोना काळात त्यांची नोकरी गेली. ते गावी परत आले. तेव्हा, गावातील अनेक प्रश्नांबद्दल, अडचणींबद्दल त्यांच्यासोबत चर्चा होत होती. गावातले प्रश्न सुटले पाहिजेत. विकास झाला पाहिजे, असं आपण नुसतं म्हणतो. पण, कोणीतरी येईल, बदल घडवेल, आपले प्रश्न सोडवेल, यावर माझा विश्वास नव्हता. त्यामुळे आपणच परिवर्तनाचे शिलेदार होऊ या, या भावनेनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या पल्लवी 461 मतं घेऊन विजयी झाल्या आहेत.

पल्लवी यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. जेमतेम शेती असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. फारसं राजकीय, आर्थिक पाठबळ त्यांच्याकडे नाही. तरुण मुली अधिक प्रमाणात राजकारणात आल्या, तर राजकारणाचा आजचा पोत बदलेल, असे पल्लवी यांना वाटतंय. परिवर्तनाची सुरुवात स्वत:पासून करावी, या विचाराने पल्लवी यांनी राजकारणात उतरुन निवडणूक लढवलीय.

त्या सांगतात की, एका ग्रामपंचायत सदस्याकडून तशा ग्रामस्थांच्या अपेक्षा तरी किती असतात?. नियमित पाणी, दैनंदिन स्वच्छता, गटारं, अंतर्गत प्रश्न मार्गी लागावेत, हीच ग्रामस्थांची माफक अपेक्षा असते. त्यामुळे या प्रश्नांवर मी भर देईन. त्याशिवाय गावाच्या हिताच्या आड येणारं कोणतंही काम मी करणार नाही, असेही पल्लवी यांनी ठामपणे सांगितलंय.

ग्रामपंचायत सदस्य म्हणून सर्वात आधी कोणतं काम कराल? असे विचारलं असता त्या म्हणाल्या, गावातील केंद्रीय प्राथमिक शाळेत काही गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवले जावेत यासाठी प्रयत्न करेन. याशिवाय रोजगारासाठी गावातल्या तरुणांचं होणारं स्थलांतर थांबवण्यासाठी, तरुणांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेती उत्पादनाला थेट बाजारपेठ, व्यवसायिकांना बँका, फायनान्स कंपन्या, सहकारी संस्था आणि पतपेढ्या यांच्या मार्फत कर्ज मिळवून देऊन व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करेन. गावामध्ये नोकरी मिळत नसल्याने आजच्या घडीला प्रत्येक कुटुंबातील एक तरुण मुंबईला स्थलांतरित होत आहेत. त्यांना गावात रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही पल्लवी यांनी यावेळी सांगितलंय.