Heat Wave : संपूर्ण कोकणाला उष्णतेच्या लाटेचा तडाखा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  शनिवारी देखील गुजरात आणि मुंबई सह संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट कायम होती. पुढील पाच दिवस संपूर्ण कोकणासह राज्यभरात बहुतांशी जिल्ह्यात कमाल तापमान चढेच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या शहरांसह उर्वरित शहरांच्या कमाल तापमानाचा पारा ३८ अंशावर दाखल झाला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट जाणवत आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ६ अंशांची वाढ नोंदविण्यात येत आहे. पालघर आणि रत्नागिरी येथील कमाल तापमान कहर केला आहे. हे कमाल तापमान ४० अंश एवढे नोंदविण्यात येत असून, दिवस संपूर्ण राज्यभरात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिक येथील हवामान पुढील पाच दिवस उष्ण नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मुंबईत कमाल तापमानाची नोंद ३९ अंश सेल्सिअस शनिवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास एवढी झाली आहे. राज्यभरात यापूर्वी अवकाळी पावसाने कहर केला असून बहुतांश ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. त्यात आता मार्च महिन्यातच दाखल झालेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिकांना चटके दिले असून एप्रिल आणि मे महिन्यात यात आणखी वाढ नोंदविण्यात येईल, अशी शक्यता देखील हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबईला आजचा दिवस येथील उष्ण नोंदवण्यात आला असून ठाण्यात देखील फार काही वेगळी परिस्थिती नव्हती. दुपारी चार वाजेपर्यंत बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाने ३८ अंशाचा पारा पार केला होता.