मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेत्री कंगना रानौत हिचा ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाच्या रिलीज आगोदर येणाऱ्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. या चित्रपटाला प्रथम करणी सेनेकडून विरोध होत असताना. आता याचित्रपट विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे वंशज विवेक तांबे यांनी चित्रपटनिर्माती कंपनी एस्सेल एंटरटेन्मेंट मीडिया व अन्य अनेकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असा अर्ज उल्हासनगर येथील दंडाधिकारी न्यायालयात केला आहे.
राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म वाराणसी येथे १९ नोव्हेंबर १८३५ साली झाला होता. मात्र या चित्रपटातील पोस्टरवर त्यांचे जन्मवर्ष १८२८ असे नमूद केले आहे. तसेच लक्ष्मीबाई यांचा विवाह १८४२ मध्ये सात वर्षाच्या असताना झांसी येथील गणेश मंदिरात राजे गंगाधन नेवाळकर यांच्यासोबत झाला होता मात्र या चित्रपटात विवाहाच्या वेळी त्या १४ वर्षांच्या होत्या, असे दाखवण्यात आले आहे. अशाचप्रकारे त्यांच्या मुलाच्या जन्माविषयीही चुकीची वस्तुस्थिती दाखवण्यात आली आहे. त्यांचा जन्म, विवाह, मृत्यू व आयुष्याविषयी चुकीचा तपशील चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
तसेच या चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांबाबत ढवळाढवळ केली असून अनेक चुकीचे संदर्भ यातून लोकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाने सरकारी नोंदींत फेरफार केली असून याद्वारे लोकांची फसवणूक केली आहे. असा दावा या अर्जात केला आहे. ही याचिका उद्या, बुधवारी न्या. ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस येण्याची शक्यता आहे.