राजभवनात जाण्यापेक्षा नागपूरला जाऊन मतदारसंघातील नागरिकांना मदत करा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन –  राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपाने आज केलेल्या आंदोलनावरती टीका करत महाविकास आघाडी सरकार कोरोना संकटाचा सामना खंबीरपणे करत असताना राज्यात अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी आटापिटा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे हसे झाले आहे, असे म्हणत वारंवार राजभवनाच्या अंगणात जाण्याची सवय लागलेल्या भाजपा नेत्यांनी आतातरी स्वतःच्या अंगणात म्हणजेच मतदारसंघात जाऊन नागरिकांना मदत करावी, असा चिमटा देखील यावेळी त्यांनी काढला आहे.

भाजपाने राज्यभर केलेल्या ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनाचा समाचार घेत थोरात म्हणाले, कोरोनाच्या संकट काळात राजकारण न करता सहकार्याची भूमिका घ्या, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला काँग्रेस सह इतर विरोधी पक्षांनी साथ दिली. मात्र, मोदींच्या पक्षाचे राज्यातील नेतेच त्यांच्या या आवाहनाला बगल देत महाराष्ट्रात राजकारण करण्यात आकंठ बुडालेले आहेत. सत्ता गेल्याने राज्यातील भाजपाचे नेते वैफल्यग्रस्त झाले असून, सत्तेसाठी त्यांची तडफड होतेय. विरोधी पक्षाने कोरोनाच्या संकट काळात सरकारला विधायक सूचना केल्या तर त्यांचे स्वागतच केले जाईल. परंतु, त्यांना राजकारण करायचे असल्याने रोज राजभवनाच्या फेऱ्या मारून आता त्यांनी घरच्या अंगणालाच रणांगण केलं असल्याचा टोला त्यांनी लगावला.

तसेच, चंद्रकांत पाटील यांचे खरे आंगण कोणते? पुणे की कोल्हापूर? देवेंद्र फडणवीस तरी त्यांच्या नागपूरला गेले का? त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते मदत करत आहेत. पाच वर्ष सत्तेत असताना महाराष्ट्राची फसवणूक करणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव पूर्णपणे फसला असून मेरा आंगण मेरा रणांगण या आंदोलनाचा बार फुसका ठरला आहे. या आंदोलनाचा जनतेचा तर नाहीच पण भाजप कार्यकर्त्यांचाही प्रतिसाद मिळाला नाही, अनेक ठिकाणी भाजपाच्या नेत्यांनी रखरखत्या उन्हात लहान मुलांना आंदोलनासाठी उभे करून वेठीस धरल्याचे पहायला मिळाले, असेही ते म्हणाले.

दरम्यान, विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना थोरात यांनी म्हटलं की, विविध राज्यातील ५० लाखांहून अधिक मजुरांना रोजगार देणाऱ्या महाराष्ट्रासोबत केंद्रातील सरकार दुजाभाव करत आहे. केंद्राला सर्वात जास्त कर देऊनही केंद्राकडून राज्याला अपेक्षित मदत दिली जात नाही. वैद्यकीय उपकरणे, PPE किट, टेस्टिंग कीट, औषधे आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य मागणीच्या अवघे ३० टक्के पुरवली जात आहे. केंद्र सरकारने जीएसटी परताव्याची रक्कम, विविध कल्याणकारी योजनांचा निधी व जीएसटी व्यतिरिक्त इतर कराच्या परताव्यपोटीची रक्कम अद्याप देऊ केली नाही. केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमधील केवळ २ लाख दहा हजार कोटी रुपयेच खर्च करण्यासारखे आहे, त्यातील सर्वाधिक रक्कम ही मनरेगासाठी आहे. त्यामुळे यातून कोणालाही थेट मदत मिळत नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.

त्यांनी पुढं सांगितलं की, राज्य सरकारने आतापर्यंत ४३४ ट्रेनमधून ६ लाखांहून अधिक स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पाठवलं आहे. तर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून ३ लाख ६५ हजार मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहचविण्यात आलं. महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांची संख्या पाहता दररोज ९० रेल्वे सोडण्याची आवश्यकता आहे. पण प्रत्यक्षात ४५ ते ५० गाड्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

संकटात असणाऱ्या राज्याला राजकीय रणांगण बनवणे हे कुठले शहाणपण आहे ? राजकारणासाठी आयुष्य पडलं आहे. आजची वेळ निर्धाराने आणि एकजुटीने लढण्याची आहे. इतिहासात भाजपाने केलेली आजची ही काळी कृती कधीही विसरणार नाही. कोरोनाच्या लढाईत सरकार, प्रशासन, डॉक्टर्स, नर्स, पोलिस दल, सफाई कर्मचारी यांच्यासह विविध क्षेत्रातले लोक व सामाजिक संस्था जीवाची पर्वा न करता आहोरात्र झटत आहे. अशा वेळी एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून सत्ता मिळवण्याची धडपड करण्यापेक्षा भाजपा नेत्यांनी गरीब जनतेस मदत करावी असं थोरात यांनी म्हटलं.