…म्हणून बंद होणार आहे ‘कानपूरवाले खुराणाज्’ शो

मुंबई : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन सुनील ग्रोव्हरचा ‘कानपूरवाले खुराणाज्’ हा कॉमेडी शो चर्चेत आहे. पण आता हा शो बंद होणार आहे. याची माहिती सुनील ग्रोव्हर याने स्वतः दिली आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना हा शो का बंद होत आहे ? असा चाहत्यांना प्रश्न पडला असेल, तर हा शोबंद होण्याचे कारण मीच आहे असे सुनीलने सांगितले.
खुद्द सुनील ग्रोव्हरनेच दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. माझा शो माझ्यामुळेच बंद होत आहे. असे सुनीलने यावेळी सांगितले. मी हा शो केवळ ८ आठवड्यांसाठीच साईन केला होता. कारण मी आधीच ‘भारत’ या चित्रपटासाठी माझ्या डेट्स दिल्या होत्या. मी प्रेस कॉन्फरन्स व अनेक मुलाखतीतही हे स्पष्ट केले होते. माझ्या हाती जितका वेळ होता, तितकाच मी देऊ शकलो. मी टीव्हीला खूप मिस करत होतो. ‘भारत’च्या शूटींगदरम्यान माझ्याकडे महिनाभराचा वेळ होता. त्यामुळे मी महिनाभराचा शो सत्कारणी लावला.

‘भारत’ चित्रपटात सुनील ग्रोव्हर महत्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. पुढील दीड महिना या चित्रपटाचे शुटिंग चालू राहणार आहे. १३ डिसेंबर रोजी ‘कानपूरवाले खुरानास’ हा शो सुरू झाला. यामध्ये अली असगर, सुगंधा मिश्रा, उपासना सिंह हे कलाकारसुद्धा होते. त्यासोबतच कुणाल खेमूनेही या शोद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं.