‘त्या’ हल्ल्याच्या शक्यतेमुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर आगामी तीन महिन्यात दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा भारताच्या गुप्तचर संघटनांनी दिला आहे. यामुळे रेल्वेने सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. इतकेच नाही तर, अति दक्षतेचा इशाराही जारी केला आहे. मुख्य म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे समजत आहे. लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची खात्रीलायक माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे मुंबईसह संबंध महाराष्ट्रात हाय अलर्ट आहे आणि पोलीस यंत्रणाही सतर्क आहे.

गुप्तचर संघटनेने दहशतवादी हल्ल्याबाबत माहिती दिल्यानंतर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आदेश बुधवारी दिले आहेत. सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा, संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, रेल्वे स्थानकांवर विशेष करून लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये शोध मोहीम हाती घ्या अशा सूचना रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मुंबईतील लोकलमध्ये रोज  लाखो लोक प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे निर्णय घेण्यात आले आहेत.

नुकत्याच काही घटना समोर आल्या. पुलवामा दहशतवादी हल्ला, आपटा येथे बसमध्ये सापडलेला बॉम्ब आणि कानपूर-भिवानी कालिंदी एक्स्प्रेस शौचालयातील दुर्घटना अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. या सर्वांचा विचार करता हा हाय अलर्ट जारी केला आहे. गुप्तचर संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 3 महिन्यात मुंबई रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  मुंबईतील रेल्वे स्थानकांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: दिल्लीकडून येणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमध्ये बॉम्बशोधक पथकाद्वारे आणि श्वान पथकाद्वारे तपासणी करण्याचे आदेश दिले गेले आहेत.