कंगना रणौत आणि बहीण रंगोली चंदेल यांना हायकोर्टाकडून दिलासा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. अनेकदा ती वादग्रस्त किंवा समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्येदेखील करत असते. सांप्रदायिक ट्विटप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरमुळं ती गोत्यात आली होती. परंतु आता या प्रकरणी तिला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा देत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं आहे.

आज वांद्रे पोलीस ठाण्यात कंगना रणौतला चौकशीसाठी हजर राहायचं होतं. तिला यासाठी 3 वेळा समन्स बजावण्यात आलं होतं. तरीही ती उपस्थित राहिली नव्हती. या प्रकरणी काल कंगनानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.

कारण कंगनाला जेव्हा पूर्वी 2 वेळा समन्स बजावण्यात आलं होतं तेव्हा तिनं खासगी कारण देत चौकशीला हजर राहाणं टाळलं होतं. यानंतर तिला तिसऱ्यांदा समन्स बजावलं होतं. तिसरा समन्स हा फायनल अल्टीमेटम होता. कारण यानंतरही जर कंगना हजर राहिली नसती तर तिला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

वांद्रे न्यायदंडाधिकारी कोर्टानं 16 ऑक्टोबर रोजी, 2 समुदायांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल आणि समाजातील सौदार्हपूर्ण वातावरण व जातीय सलोखा बिघडेल अशा हेतूनं सोशल मीडियावर वारंवार विधानं केल्याच्या आरोपांनंतर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. यानंतर कंगना आणि रंगोली यांनी दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान देण्यासोबत एफआयआर रद्द करण्याची मागिणी याचिकेद्वारे केली होती. हायकोर्टानं यावर सुनावणी घेत कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांना पोलिसांच्या अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं आहे.

पोलिसांनी 17 ऑक्टोबर रोजी कंगना आणि तिची बहीण आणि मॅनेजर रंगोली चंदेल यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला. यात भारतीय दंड संहितेच्या 124 अ (देशद्रोह) या कलमासोबतच 153 अ (धार्मिक व जातीय सलोखा बिघडवणं) आणि 295 अ (धार्मिक भावना दुखावणं) या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता.