हैदराबाद रेप केस : एन्काऊंटर झालेल्या आरोपींवर 9 तारखेपर्यंत अत्यंसंस्कार नाहीत, याचिका दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशभर चर्चेत असलेल्या हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणाविरुद्ध तेलंगणा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने या प्रकरणाविरुद्ध याचिका दाखल करून घेतली असून एन्काऊंटर बद्दल पोलिसांना आता सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. प्रकरणाची पुढची सुनावणी ही ९ डिसेंबरला होणार आहे.

तोपर्यंत आरोपींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार न करण्याचा आदेश कोर्टाने पोलिसांना दिला आहे. या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अनेक संघटना आणि काही राजकीय पुढाऱ्यांनी, विचारवंतांनी विरोध दर्शविला होता. तर दुसऱ्या बाजूने संतप्त झालेल्या सामान्य जनतेने या एन्काऊंटरचे स्वागत केले होते. हे प्रकरण कायद्याला धरून नसल्याचे सांगत अनेक दिग्गज नेत्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची आवाहन केले होते. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात दाखल झाले असून याबाबत पोलिसांना आता झालेल्या प्रकरणाची संपूर्ण माहिती सादर करावी लागणार आहे.

नेमकं काय घडलं ?
हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना मध्यरात्री घटनास्थळी तपासासाठी नेण्यात आले होते, परंतु सर्व आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. ही घटना राष्ट्रीय महामार्ग ४४ वर घडली अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

या प्रकरणी कोर्टाने सर्व आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलीस कोठडीत या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. ‘आम्ही चौघे पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे असं समजून तिला जाळण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु तेव्हा ती जिवंत होती,’ असा आरोपीने खुलासा केला होता.

तसेच ‘सामूहिक बलात्कारानंतर पीडित महिला पळून जाऊ नये म्हणून आरोपींनी तिचे हातपाय बांधले. तसंच त्या महिलेला जबरदस्ती दारूही प्यायला लावली. त्यानंतर ती महिला बेशुद्ध पडताच तिला पुलाखाली नेण्यात आलं आणि तिथं तिच्या अंगावर पेट्रोल टाकून त्या महिलेला जाळण्यात आलं,’ असे खळबळजनक खुलासे देखील आरोपींने केले असल्याचे विविध माध्यमांतर्फे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाचा देशभरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत होता.

दरम्यान, पोलीस आरोपींना घेऊन मध्यरात्री घटनास्थळी गेले होते. त्यावरून आता सगळीकडे प्रश्न उपस्थित केला जात आहे की पोलिसांनी मध्यरात्रीचीच वेळ ठरवून आरोपींना घटनास्थळी का नेलं. त्यांच्यात झालेली चकमक ही घडवून आणली होती असा आरोप आता सगळीकडे होतोय. यावर पोलिसांनी सांगितले की लोकांना माहिती होऊ नये म्हणून अधिक माहिती मिळविण्यासाठी आरोपींना मध्यरात्री घटनास्थळी नेण्यात आले होते. परंतु त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करत शस्त्र हिसकावून आमच्यावर हल्ला केला त्यामुळे त्यांना ठार करण्यात आले.

Visit : Policenama.com