राकेश मारियांच्या ‘हिंदू दहशतवाद’च्या दाव्याला उज्जवल निकम यांचे ‘समर्थन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी त्यांच्या ‘लेट मी से इट नाऊ’ या पुस्तकात मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याबाबत खुलासा केला आहे. 26/11 चा हल्ला घडवून आणणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाने या हल्ल्याला ‘हिंदू दहशतवादा’चं रुप देण्याचा कट रचला होता, असा दावा मारिया यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. या मुद्यावरून भारतात एकच राजकीय घमासान पेटले असताना सरकारी वकील उज्जवल निकम यांनी मारिया यांच्या ‘हिंदू दहशतवादा’च्या दाव्यांना दुजोरा दिला आहे.

26/11 रोजी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ला प्रकरणात मारिया यांचे समर्थन करताना उज्जवल निकम म्हणाले, हो हे खरं आहे की ओळखपत्रात दहशतवाद्यांची नावं हिंदू नमूद करण्यात आली होती. मुंबई कोर्टात कसाबनं दिलेल्या जबाबात 10 दहशतवाद्यांकडे 10 बनावट ओळखपत्रं होती. हे समोर आलं होतं. या ओळखपत्रांचा वापर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी केला जाणार होता, हे आम्ही कोर्टासमोर सिद्धही केलं असल्याचे निकम यांनी म्हटलं आहे.

मारिया यांचा दावा
तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात मुंबई दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेल्या एकमेव दहशतवादी अमिर अजमल कसाब याच्या मनगटावर हिंदुंचा पवित्र धाका ‘कलावा’ बांधण्यात आला होता, असा खुलासा केला. लष्कर ए तोयबानं मुंबई हल्ला ‘हिंदू दहशतवाद्यां’नी घडवून आणला असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केल्याचंही मारिया यांनी या पस्तकात म्हटले आहे.