गणेश जन्मकथा आणि गणेश उत्सवाचा इतिहास

पोलीसनामा ऑनलाईन टीम : (अमृता पवार ) – गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांच़ा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये ऐकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते. हिंदू धर्मीयांच़े आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाच़े आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते, व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साज़रा करण्यात येतो.

गणपतीची जन्मकथा

एकदा पार्वती मातेला स्नान करण्यासाठी जायचे असतांना बाहेर कोणीच पहारेकरी नसल्यामुळे पार्वती मातेने मातीची मूर्ती तयार केली आणि ती जिवंत केली. आणि पहारेकरी म्हणून उभे राहण्यास सांगितले व आतमध्ये कोणालाही येऊ देऊ नकोस असे सांगून पार्वती माता स्नान करण्यास निघून गेली. काही वेळाने भगवान शंकर तिथे आले व आत जाऊ लागले. पहारेकर्‍याने त्यांना रोखले. भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकर्‍याचे शिरच उडवले. पार्वतीमाता स्नान करून परत आल्यावर पहारेकर्‍याला मारलेले पाहून अतिशय संतापली.

तेव्हा शंकरांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक कापून तो घेऊन आला. भगवान शंकरांनी ते मस्तक पुतळयाला लावले व जिवंत केले. हा पार्वतीमातेचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) असलेला गजानन होय. भगवान शंकराच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर म्हणून गणेश हे नाव ठेवले. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे. या दिवशी भक्तगण श्रीगणेशाची पूजा, प्रार्थना व तसेच उपवास करून भक्ती करतात.

भाद्रपद चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात फार मोठा उत्सव साजरा होत असतो. श्रीगणेशाचे वास्तव्य या काळात मानण्यात येऊन गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी व्रत- गाणपत्य संप्रदायाचे हे एक महत्वाचे व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी या असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदी किनारी जावून, स्नान करून मातीची आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून ती लगेच नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात.

महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी. अशी या मागे धारणा आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा शिवा असेही म्हणतात. गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रहमणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होवून पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते.

आरोग्यविषयक वृत्त –