गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा नाहीच !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रावरून राजकारण चांगलाच तापलं आहे. तर यावरून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा होत असतानाच आता गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही, असा निर्णय राष्ट्रवादी पक्षाने घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

तर नवाब मलिक म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांना भेटल्याचा आरोप करणारे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी कटकारस्थान करुन महाविकास आघाडीला आणि गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची चौकशी होईलच व त्यादृष्टीने कारवाई होणार. असे ते म्हणाले. तसेच पुढे मलिक म्हणाले, परमबीर सिंग यांनी बदली झाल्यावर हे पात्र लिहलं आहे. परमबीर सिंग यांनी १७ मार्चला बदली होणार हे माहित असताना १६ मार्चला काहीतरी प्रश्न विचारुन चॅट पुरावा तयार केला. त्या चॅटनुसार गृहमंत्री देशमुख हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सचिन वाझेना भेटले असा उल्लेख करण्यात आला आहे.

मात्र, या दरम्यान गृहमंत्री देशमुख हे त्यावेळी विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्याचवेळी त्यांना कोरोना झाला. १५ दिवस हॉस्पिटलमध्ये नंतर २७ फेब्रुवारीपर्यंत गृहविलगीकरणात होते. २७ फेब्रुवारीला त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. असे असतानाही पुरावा तयार करून कटकारस्थान रचत बदनाम करण्याचा हा प्रयत्न होता, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. हा आरोप गंभीर आहे याची चौकशी होईल या चौकशीत जे निष्पन्न होईल त्यादृष्टीने कारवाई करण्यात येईल असेही मलिक यांनी म्हटले आई.

विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी –

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले गंभीर आरोप आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेचा सहभाग स्पष्ट झाल्याने राज्य सरकारची पुरती कोंडी झाली आहे. तर शरद पवार यांनी तो चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे. परंतु, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावरुन भाजपा आक्रमक झाली आहे. भाजप आंदोलन करत रस्त्यावर उतरत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तसेच भाजपचे आमदार राम कदम यांनी पोलीस महासंचालक हेमंत नागराळेंची भेट घेणार असल्याचे सांगितलं आहे.