‘या’ पदार्थांच्या नियमित सेवनाने वाढेल रोगप्रतिकारशक्ती

पोलीसनामा ऑनलाईन टीम – रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक टीबी रुग्ण भारतामध्ये आहेत. येथे दरवर्षी जवळपास तीन लाख लोकांचा मृत्यू टीबीमुळे होतो. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आणि टीबीची शक्यता कमी करणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. कडधान्य, दूध, गाजर, टोमॅटो, अंडी, डाळी यांचा भरपूर समावेश आहारात असावा.

कडधान्यात भरपूर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि फायबर्स असल्याने थकवा दूर होतो. तसेच यामुळे संसर्गही होत नाही. मुलांच्या आहारात कडधान्याचा आवर्जून समावेश करावा. यामुळे ऊर्जा वाढते आणि मुलांचा विकासही लवकर होतो. गाजरमध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट आहे. यामुळे गाजर आहारात समाविष्ट करावे. हिवाळ्यात गाजराचा रस पिणेदेखील फायद्याचे आहे. यामुळे संसर्ग होत नाही. गाजरामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यातही याची मदत होईल. टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि लायकोपिन असते. त्यामुळे ऊर्जा मिळते. टोमॅटोचे सूप किंवा त्याचा रस पिणेदेखील लाभदायक आहे. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी असते त्यांनी आपल्या आहारात टोमॅटोचा समावेश केला पाहिजे. यामुळे टीबीच्या संसर्गापासून बचाव होऊ शकतो.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा रोजच्या आहारामध्ये समावेश केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच भरपूर व्हिटॅमिन डी आणि प्रथिने असलेल्या अंड्यांद्वारेही टीबीपासून बचाव करता येऊ शकतो. त्यासाठी दररोज उकळलेली अंडी खावीत, कच्ची अंडी खाण्याचे टाळावे. तथापि, उच्च रक्तदाब, हृदयविकाराच्या रुग्णांनी अंडी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डाळींमध्ये जीवनसत्त्वे, खनिज, फायबर्स असतात. डाळींमध्ये भाज्या टाकून खाणेदेखील फायद्याचे ठरते. यात कॅलरीचे प्रमाणही कमी असल्याने वजन नियंत्रित राहते. डाळींमधील अँटी इंफ्लेमेटरी, अँटी मायक्रोबियल गुण प्रतिकारशक्ती वाढते.