सायनसच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ज्यांना सायनसचा त्रास आहे त्यांनी आहार आणि जीवनशैलीबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. सायनस म्हणजेच अस्थिविवर ही समस्या हिवाळ्यात अधिक जाणवते. शिंक येणे, नाक वाहणे, डोकेदुखी, डोके किंवा डोळ्यांवर दबाव जाणवणे, हलका ताप येणे आणि भूक न लागणे यांसारखी लक्षणे दिसतात. यासाठी सायनसचा आजार असल्यास योग्य काळजी घेतली पाहिजे.

सायनसच्या आजारात कोणती काळजी घ्यावी, कोणता आहार घ्यावा याबाबत आपण जाणून घेणार आहोत. सायनसचा त्रास असणारांनी आहारात मिठाचा वापर जास्त प्रमाणात करू नये. कारण मिठामुळे उतींमध्ये द्रव एकत्र होऊ लागते. अशा वेळी सायनस इन्फेक्शन वाढू शकते. तळलेले, मसालेदार, स्टार्चयुक्त, तांदूळ तसेच मैद्यापासून बनवलेले केक, पाय, मॅक्रोनी यांसारखे खाद्यपदार्थ आणि साखर किंवा कँडी यापासून दूर राहिले पाहिजे.

भरपूर अ जीवनसत्त्व असलेले दूध, दही, काशीफळ, पालेभाज्या, टोमॅटो आणि पपईचे सेवन करावे. दुधातून भरपूर कॅल्शियम मिळत असल्याने ज्यांना सायनसचा त्रास आहे त्यांनी दुधाचा आहारात समावेश करावा. तसेच शिळे अन्न खाऊ नये. २०० मिली पालकाच्या ज्यूसमध्ये ३०० मिली गाजराचा रस मिसळून सेवन केल्यानेही सायनसच्या त्रासातून आराम मिळू शकतो. फ्रिजमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ लगेचच खाऊ नये. असे केल्यास सायनस असलेल्यांना घातक ठरू शकते.