भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसाला बेदम मारहाण, आ. राम कदमांचा आरोपींना वाचविण्यासाठी फोन!

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – एका पोलीस कॉन्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. आरोपी हे आमदार राम कदम यांचे कार्यकर्ते असून त्यांना वाचविण्यासाठी आ. कदम यांनी मारहाण झालेल्या पोलिसाला तक्रार मागे घेण्यासाठी फोन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने आ. कदमांच्या या भूमिकेचा निषेध केला आहे.

नितीन खैरमोडे असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, पवईच्या हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एका ज्येष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला भाजपच्या कार्यकर्ते सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर दुचाकीवरुन येत धडक दिली होती. नियमांचं उल्लंघन करत हे भाजपचे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करत होते. यावेळी घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे दाखल झाले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन रिक्षाने नेत असताना कार्यकर्त्यांनी रिक्षातच खैरमोडे यांना जबर मारहाण केली. या तिघांना वाचविण्यासाठी आ. कदम यांनी खैरमोडे यांना फोन केला. राम कदम आणि खैरमोडे यांच्यात झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे.

तुम्हाला झालेल्या मारहाणीचं मी समर्थन करत नाही. पण मानवतेच्या दृष्टीकोनातून आणि त्या तिघांच्या भविष्याचा विचार करा. त्या तिघांच्या करिअरचा प्रश्न आहे, त्यांचे लग्नही झालेले नाही, असे सांगत आ. कदम यांनी खैरमोडे यांच्याकडे तक्रार मागे घेण्याची मागणी केली. दरम्यान, कॉन्स्टेबल खैरमोडे यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिमेचा प्रश्न असून असे करणे योग्य ठरणार नाही, असे ठामपणे सांगून राम कदम यांच्या मागणीला स्पष्ट नकार दिला.

राम कदम यांच्या भूमिकेचा निषेध
पोलिसाला मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी फोन करण्याच्या राम कदम यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. “राम कदम यांनी फोन करण ही अतिशय दुर्दैवी बाब असून कायद्याचे संरक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना पाठिशी घालून राज्यात उत्तर प्रदेश आणि बिहारसारखी संस्कृती आणण्याचा विचार आहे का?”, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वंदना चव्हाण यांनी केला आहे.