…तर कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करावा लागेल, भाजप कार्यकर्त्याचे विधान (व्हिडीओ)

गुरुग्राम: पोलीसनामा ऑनलाईन – कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी गेल्या 3 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. असे असताना भाजपचा एक व्हिडीओ समोर आला आहे. कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी आमच ऐकायला तयार नाहीत. कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ दिल्या जाणाऱ्या तर्कांच्या आधारावर ते बोलत नाहीत. तर त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करावा लागेल, असे भाजपचा एक कार्यकर्ता व्यासपीठावरील नेत्यांना सांगत असल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. त्यामुळे भाजप अडचणीत आला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. सुरजेवाला यांनी व्हिडीओ शेअर करताना भाजपवर निशाणा साधला आहे.

 

 

 

 

हरीयाणातील गुरुग्राममध्ये कृषी कायद्यांबद्दल संवाद साधण्यासाठी भाजपकडून एका बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला हरीयाणा युनिटचे प्रमुख ओ. पी. धनखड, क्रीडा मंत्री संदीप सिंह आणि हिसारचे खासदार बृजेंद्र सिंह उपस्थित होते. त्यांच्या समोर एका भाजप कार्यकर्त्याने शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. भाजपचे कार्यकर्ते पक्षाचे नेते आणि मंत्र्यांना भेटत आहेत. शेतकऱ्यांना कस मूर्ख बनवायचे याबद्दल विचारणा करत आहेत. भाजपकडून दिले जाणारे तर्क शेतकऱ्यांना पटत नाहीत हे यातून स्पष्ट होत आहे. हाच भाजपचा खरा चेहरा आहे, जो शेतकऱ्यांना दिसत नाही, असे सूरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या 3 महिन्यांपासून शेतकऱ्यांच आंदोलन सुरु आहे. सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही यावर तोडगा निघालेला नाही.