लाज कशी वाटत नाही?’ ही टॅगलाईन घेऊन महाआघाडी करणार प्रचार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘मै भाई चौकीदार हू’ ही टॅग लाईन घेऊ भाजप २०१९ च्या निवडणूक रिंगणात उतरले आहे तर आता पाच वर्षांची जनतेची फसवणूक शेतकरी कर्जमाफी, उज्ज्‍वला योजना, युवकांना नोकऱ्या यासारख्या फसव्या योजना व घोषणांमुळे मोदी सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आहे. हेच प्रश्न घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी ‘लाज कशी वाटत नाही’ ही टॅग लाईन घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी अशा प्रकारे विविध जाहिरातींच्या माध्यमातून राज्यात संयुक्तपणे प्रचार करणार आहे.

‘लाज कशी वाटत नाही’? या प्रचार अभियानाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करत सरकार विरोधातील मुद्दे प्रचारात घेणार असल्याचे काँग्रेसचे नेते खासदार हुसेन दलवाई, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

याबाबत बोलताना नवाब मलिक यांनी सांगितले की, पाच वर्षापूर्वी सत्तेत येताना महागाई कमी करण्याच आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात ती कमी होण्याऐवजी वाढत आहे. उज्ज्‍वला योजनेचा मोठा गाजावाजा केला जात असला तरी गॅसचे वाढत जाणारे दर जनतेला परवडणारे नाहीत. दरवर्षी तरुणांना दोन कोटी नोकऱ्या उपलब्ध करून देण्याच आश्वासन हवेत विरले. बेटी बचाव, बेटी पढाव अशी घोषणा एकीकडे केली जाते आणि दुसरीकडे भाजप आमदार मुली पळवून आणण्याची भाषा करतात. यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत देशातील जनतेच्या मनात असलेले प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडी मांडणार आहे. यापुढे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या पत्रकार परिषदाही निवडणुका संपेपर्यंत संयुक्तिकच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.