मध्य प्रदेशात राजकीय भूकंप ! भाजपाचं ऑपरेशन ‘लोटस’ ? काँग्रेससह इतर पक्षाचे 8 आमदार ‘गायब’, सत्ताधाऱ्यांचा ‘आरोप’

भोपाळ : वृत्त संस्था – मध्य प्रदेशमधील राजकीय वातावरण तापले असून आपले 8 आमदार भाजपाने ओलीस ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपाने सुरू केलेल्या या राजकीय खेळीमुळे मध्य प्रदेशात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी भाजपा आमदार खरेदी करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे हे आठ आमदार मंगळवारी मध्यरात्री हरयाणातल्या मानेसरमधल्या एका हॉटेल आले आहेत. या आठ आमदारांपैकी चार आमदारांनी कमलनाथ सरकारला बाहेरुन पाठिंबा दिला आहे. तर एक काँग्रेस आमदार दिग्विजय सिंह गटातील आहे.

मध्य प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री जीतू पटवारी आणि जयवर्धन सिंह सध्या दिल्लीत आहेत. त्यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, मानेसरच्या हॉटेलमधील सर्व आमदार काँग्रेसचे आहेत. दिग्विजय सिंह सध्या हॉटेल बाहेर आहेत. मात्र पोलीस त्यांना आता सोडत नाहीत. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, भाजपा नेते नरोत्तम मिश्रा आणि माजी गृहमंत्री भूपेंद्र सिंह आमदारांना पैशांचे आमिष दाखवत आहेत, असा आरोप पटवारी यांनी केला आहे.

पटवारी म्हणाले, आम्ही हॉटेलमध्ये असलेल्या आमदारांच्या संपर्कात आहोत. मीदेखील त्याच हॉटेलमध्ये थांबलो आहे. बहुजन समाज पार्टीच्या आमदार रमाबाई माझ्यासोबतच आहेत. शिवराज सिंह चौहान यांना सत्तेची हाव आहे. त्यामुळेच सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्याकडून कटकारस्थाने आखली जात आहेत. मात्र यात ते यशस्वी होणार नाहीत. दरम्यान, आमदार रमाबाई मुलीच्या उपचारांसाठी दिल्लीला गेल्याची माहिती त्यांचे पती गोविंद सिंह यांनी दिली. रमाबाई कमलनाथ सरकारसोबतच असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँगेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मध्यप्रदेशातील या राजकीय घडामोडींसंदर्भात एक ट्विट काल केले होते. यामध्ये त्यांनी काँग्रेस, समाजवादी, बसपाच्या आमदारांना दिल्लीला नेण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याचे म्हटले होते. भाजपाचे माजी मंत्री भूपेंद्र सिंह आमदार रमाबाई यांना चार्टर्ड विमानाने दिल्लीला गेल्याचे देखील त्यांनी म्हटले होते.