IPL 2019 : आयपीएलच्या अंतिम सामन्याचे स्थळ बदललं

मुंबई : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमिअर लीगच्या १२ व्या मोसमाचा अंतिम सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. १२ मे रोजी हा सामना होणार आहे. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने स्टेडियममधील I,J आणि K हे स्टँड प्रेक्षकांसाठी खुले करण्यास नकार दिल्याने, हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सुत्रांनी सांगितले. चेन्नईला पहिल्या क्वालिफायरचे यजमानपद देण्यात आले, तर विशाखापट्टणम येथे एलिमिनेटर आणि दुसऱ्या क्वालिफायरचे सामने होणार आहेत.

आयपीएलच्या परंपरेनुसार प्ले ऑफचे सामने विजेत्या आणि उपविजेत्या संघाच्या मैदानावर खेळवले जातात. मात्र, बीसीसीआयनं विशाखापट्टणमची निवड केली. हैदराबादने २०१८ साली आयपीएलच्या अंतिम सामन्याचे यजमानपद भूषविले होते. त्यामुळे यंदा त्यांना एलिमिनेटर व क्वालिफायर २ चे सामन्यांचे यजमानपद मिळण्याची शक्यता होती. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तारखांमुळे ते शक्य नाही. पोलिसांनीही या सामन्यांना सुरक्षा पुरवणे शक्य नसल्याचे सांगितले.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने यापूर्वीच सांगितले होते की, ”तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनशी आम्ही चर्चा केली आहे. परंतु तीन रिकामे स्टँड्स ही समस्या आहे. हैदराबाद आणि बंगळुरू हे दोन स्टेडियम दोन प्ले ऑफ, एलिमिनेटर आणि फायनलसाठी पर्याय म्हणून ठेवण्यात आले आहे.”