‘वाझेला पुन्हा सेवेत घेऊ नका असं शरद पवार, संजय राऊतांना सांगितलं होतं’; ‘या’ नेत्याचं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राज्यात अनेक दिवस खळबळ उडाली असून, यावरून आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी एक मोठं विधान केलं आहे. सचिन वाझेचं कॅरेक्टर खराब आहे. त्याला पुन्हा सेवेत घेऊ नका असे मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, संजय राऊत आणि अनिल देशमुख यांना सांगितलं होतं. परंतु, माझं ऐकलं गेलं नाही. सरकारनं ही मोठी चूक केली, असे अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

तसेच अबू आझमी म्हणाले, ख्वाजा युनुस मृत्यू प्रकरणात वाझे हे आरोपी आहे. त्याच्या विरोधात खटला सुरू आहे. वाझेला पुन्हा सेवेत घ्यायला नको होते. त्याला पुन्हा घेण्यात आल्याचे कळल्यावर मी शरद पवार, संजय राऊत आणि अनिल देशमुख यांच्याकडं गेलो होतो. त्याला अशा परिस्थितीत घेऊ नका असं सांगितलं होतं. परंतु माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काहीतरी वेगळा सल्ला राज्य सरकारला दिला असावा. तो सल्ला मानून सचिन वाझेला सेवेत घेतलं गेलं. ही सगळ्यात मोठी चूक होती, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. तसेच, सभागृहात विरोध पक्षाच्या नेत्यांनी मागणी केल्यानंतर सचिन वाझेला निलंबित केलं जायला हवं होतं. सत्ताधारी पक्षाच्या सोबत असूनही माझं हे मत आहे. त्या माणसाचं चारित्र्य पहिल्यापासून खराब होतं, असेही आझमी यांनी सांगितले आहे.

गृहमंत्र्यांवर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरच पहिली कारवाई व्हायला हवी. गृहमंत्री वसुली करायला सांगत होते तर त्यांनी त्याची कल्पना आधीच शरद पवार किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना का दिली नाही? खरंतर परमबीर हे स्वत:च पूर्वीपासून वसुलीचं काम करतात. त्यांच्या विरोधात वसुलीच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांच्यावरच आधी कारवाई व्हायला हवी. अशी प्रतिक्रिया अबू आझमी यांनी दिली.

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा सहभाग असल्याचे पुरावे आता समोर आले आहेत. वाझेची पाठराखण करणारे व निलंबन रद्द करून त्याला पुन्हा पोलीस सेवेत घेणारे ठाकरे सरकार त्यामुळं टीकेच्या रडारवर आहे.