गेल्या 4 वर्षात मोदी-शहांपासून गडकरींपर्यंत गार्‍हाणं मांडले, नाथाभाऊंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन –   भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीची वाट धरलेल्या एकनाथ खडसेंना ( Eknath Khadse) माझ्याविषयी काही आक्षेप होते तर त्यांनी वरिष्ठांकडे माझ्या तक्रारी करायच्या होत्या. या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमित शहा आणि नितीन गडकरींपर्यंत सर्वांकडे (i raised my complaint front of narendra modi and amit shah, says eknath khadse) मी तक्रारी मांडल्या. काही नेत्यांकडे तर तासनंतास बसून मुद्दे मांडले. पण न्याय मिळाला नाही. त्यामुळेच हे पाऊल उचलावं लागल्याचा पलटवार खडसे यांनी केला आहे.

खडसे एका वृत्तवाहिनीशी बोलतांना पहिल्यांदाच हा गौप्यस्फोट केला. फडणवीसांच्या कार्यपद्धतीबाबत आणि माझ्याविरोधात रचलेल्या षडयंत्रांबाबत मी गेल्या चार वर्षात सर्व वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा, अरुण जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरी यांच्यासह इतर नेत्यांकडे मी गाऱ्हाणी मांडली. सर्वांनी निमूटपणे त्या ऐकून घेतल्या. पण कुणीही माझ्यावरील अन्याय दूर केला नाही. उलट वरिष्ठांचं तुमच्याबद्दलचं मत वाईट झालं आहे. त्यामुळे काय ते तुम्ही समजून जा. असं एका नेत्याने मला खासगीत सांगतिल्याचा दावा खडसे यांनी केला आहे.

फडणवीस काय म्हणाले होते

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी औरंगाबादला होते. संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. खडसेंबद्दल बोलताना त्यांना माझ्याविषयी काही तक्रारी होत्या तर त्यांनी वरिष्ठांशी बोलायला हवं होतं, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. दरम्यान, माझ्या संपर्कात भाजपचे 10-12 आमदार आहेत. पक्षांतर बंदी कारणामुळे आमदार तूर्तास सोबत येणार नाही. निवडणुकाही त्यांना परवडणार नाहीत. पण भाजपचे 10-12 माजी आमदारही माझ्या संपर्कात असून त्यापैकी दोन-चार माजी आमदार उद्या माझ्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. नगराध्यक्ष आणि सहकार क्षेत्रातील काही पदाधिकारी उद्या माझ्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. .

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनीच फक्त संपर्क साधला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वगळता माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही. तेही एका कार्यकर्त्याने सांगितलं म्हणून पाटलांनी संपर्क साधला. त्यामुळे पक्षात राहण्यासाठी माझी मनधरणी करण्यात आली यात काही तथ्य नाही, असंही ते म्हणाले. तसेच नाथाभाऊंच्या पादुका घेऊनच मी काम करत आहे, असं पाटील सांगत असतात. त्यांनी या पादुका मला अजून दिलेल्या नाहीत. त्यांच्याकडून या पादुका मी परत घेणार आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
मग माझ्यावरच अन्याय का?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दहा-बारा जणांवर गुन्हे होते. एका मंत्र्याचं प्रकरण तर सीबीआयकडे होतं. तरीही सर्वांना क्लिन चीट मिळाली. मग माझ्यावरच अन्याय का?, असा सवाल करतानाच मला क्लिन चीट द्यावी असं माझं म्हणणं नाही. पण माझा दोष काय? हे तरी मला सांगायला हवं ना. त्याचं उत्तर मला आजपर्यंत मिळालेलं नाही, असं त्यांनी सांगितलं.