‘मला अपघाताची आकडेवारी कमी करायची नाही, मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवायं’ ; उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत सोमवारी रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते झाले. त्यावेळी महाराष्ट्र राज्य सध्या रस्ते अपघातात देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याबाबत नाराजी व्यक्त करत,येणाऱ्या काळात महाराष्ट्र अपघातमुक्त करायचा असल्याचं मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

उदघाटनावेळी मुख्यमंत्र्यांनी रस्ते विकास आणि अपघातांवर बोलले. ते म्हणाले “मला अपघाताची आकडेवारी कमी नाही करायची, तर मला या यादीत महाराष्ट्राचे नाव नकोच आहे. मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे. याबरोबरच “रस्ते सुरक्षा हा आठवडा किंवा महिन्यापुरता मर्यादित न राहता ही जीवनशैली व्हावी”, असंही त्यांनी सांगितले. तसेच नियम आणि संयम या दोन्ही शब्दांत यम आहे. जर तुम्ही वाहन चालवताना नियम आणि संयम नाही पाळला. तर यम भेटीला येतो जो आपला जीव घेऊन जातो. त्यामुळे यमाला टाळायचे असेल तर नियम आणि संयम या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

अपघात स्थळांचा शोध घेऊन तिथे ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी –
राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी. राज्यात अपघात होऊच नयेत म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असून वाहतूक नियमांचे पालन सर्वांनी करावे, तसेच अपघात होऊच नयेत म्हणून प्रयत्न व्हावेत. धोक्याचे वळण, अपघाताच्या जागा लक्षात घेऊन ट्रॉमा केअर उभारण्यात यावेत. दुर्दैवाने अपघात झाला तर जीव वाचवण्यासाठी प्रयत्न आणि सुविधा हवी. वाहन चालवण्याच्या प्रशिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सगळे नियम आणि शिस्त याची माहिती हवी. तरच ते प्रशिक्षण देऊ शकतील”, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटले आहे.