मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत लिखित ‘वास्तव कुपोषणाचं’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटामाटात मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडला. यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना भूलथापा देणाऱ्या ढोंगी मांत्रिकाच्या तावडीतून सोडवायचय असा अप्रत्यक्ष टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
मांत्रिकाच्या तावडीतून तुम्हाला सोडवायचय
यावेळी बोलताना ठाकरे म्हणले, ‘आज एक डाएटचे आणि दुसरे कुपोषणाचे जग आहे. शहरात कृत्रिम गर्भधारणा करावी लागते, तर आदिवासी भागात मुले कशी जगवायची असा प्रश्न आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्यादेखील समस्या आहेत. कोणीतरी तुम्हाला सांगतो २०२२ ला अमूक देतो आणि २०२५ ला तमूक देतो. मी अंधविश्वासाच्या बाबतीत बोलतोय. इथेदेखील आणि तिथेदेखील मला मांत्रिकाच्या तावडीतून तुम्हाला सोडवायचे आहे. नाईलाज झालाय म्हणून २०२२ साठी दिलेल्या आश्वासनावर, अंधविश्वासावर विश्वास ठेवावा लागतो, असे उद्धव म्हणाले.
‘मी डॉ. दीपक सावंत यांना मंत्रिपदापासून दूर का केले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल; पण त्यांनी आतापर्यंत दिलेले प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे आणि त्यामुळेच मला ते माझ्याजवळ हवे आहेत. माझ्याकडे काही कामे आहेत जी मला सावंत यांच्याकडून पूर्ण करून घ्यायची आहेत’, असे उद्धव यांनी सांगितले.
डॉ. सावंत यांनी यावेळी पालघर आणि मेळघाटातील कार्याच्या आठवणी सांगितल्या. जेथे वावर वांगणीमध्ये एकेकाळी बालमृत्यूने थैमान घातले होते, तिथे आज बालमृत्यूचे प्रमाण शून्य आहे, असे नमूद करतानाच नवसंजीवनी योजना कशी सुरू झाली याची माहिती दिली. १९९२ पासून कुपोषणाच्या कामाला सुरुवात केल्यानंतर बालमृत्यू रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा समग्र आढावा त्यांनी घेतला.
यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, प्रधान सचिव प्रदीप व्यास, अनुपकुमार यादव, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार होते मात्र काही कारणास्तव त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही.