‘मी जन्माने आणि कर्माने हिंदू’ : उर्मिला मातोंडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सेक्युलर असणे म्हणजे इतरांच्या किंवा स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करणे नव्हे. हिंदू हा सर्वात सहिष्णू धर्म आहे. मी जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. मी आजवर हिंदू धर्माचा बराच अभ्यास केला आहे. पण मी गरज पडेल तेव्हा धर्मानुसारच वागेन, असे ठाम मत प्रसिध्द अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Famous actress Urmila Matondkar) यांनी व्यक्त केले आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी (दि. 1) शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी अनेक प्रश्नांवर आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली. त्यांना विचारसरणीबद्दल विचारले असता त्यांनी ही भूमिका मांडली. वयाच्या आठव्या वर्षापासून मी योगसाधना केली आहे. देव हा मंदिराच्या गाभाऱ्यात असतो. त्याप्रमाणेच धर्म हा मनातला आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याविषयी जाहीरपणे बोलण्याची मला गरज वाटत नाही, असे त्या म्हणाल्या.

ट्रोलर्स हे माझ्यासाठी पदक
ट्रोलर्सचे मी स्वागत करते. ट्रोल म्हणजे मी पदक मानते. ट्रोलर्स मला नेहमी दाखवून देतात की मी योग्य मार्गावर आहे. मी मराठी आहे पाऊल पुढे टाकल्यानंतर मागे घेणार नाही, असे ही उर्मिला यावेळी म्हणाल्या.

Advt.

पदासाठी मी पक्ष बदलणा-यातली नाही
“काँग्रेस पक्ष सोडताना मी राजकारण सोडेन असे म्हटले नव्हते. काँग्रेस सोडून मला 14 महिने झाले. त्यामुळे तो विषय आता जूना झाला आहे. कोणत्याही पदासाठी मी पक्ष बदलणाऱ्यातली नाही. मला काम करण्याची संधी शिवसेनेत दिसली म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केल्याचे मातोंडकर यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या कामाचे कौतुक
महाविकास आघाडीच्या कामाचेही उर्मिला यांनी यावेळी कौतुक केलं. गेल्या एका वर्षात महाविकास आघाडी सरकारचे काम खूप चांगले आहे. उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला मुख्यमंत्री नाही, तर कुटुंबप्रमुख म्हणून सांभाळून घेताना सर्वांना पाहायला मिळाले. शिवसेनेची महिला आघाडी खूप भक्कम आहे. त्यांचा भाग होण्याची संधी मला मिळाली यासाठी मी आभारी आहे. मी शिवसैनिक म्हणून आले आणि शिवसैनिक म्हणूनच काम करेन असेही उर्मिला म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांचा विचार आवडला
उद्धवजींचा मला फोन आला. त्यांनी माझ्याशी कुटुंबातील सदस्याप्रमाणे बातचित केली. विधानपरिषदेचा सामाजिक आणि सांस्कृतिक दर्जा समृद्ध आहे, तो वारसा वाढवण्यासाठी आपण यावे, हा उद्धव ठाकरेंचा विचार मला आवडल्याचे उर्मिला यांनी सांगितले.

बॉलिवूड हे मुंबईच्या रक्तातच
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबईत बॉलिवूड कलाकार आणि दिग्दर्शकांची भेट घेणार असल्याच्या मुद्द्यावरही उर्मिला यांनी आपले मत व्यक्त केले आहे. योगी आदित्यनाथ मुंबईत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. त्यांना जय महाराष्ट्र सांगू शकता, असे उर्मिला म्हणाल्या. बॉलिवूडला उत्तर प्रदेशात हलविण्याचा योगी आदित्यानाथ यांचा विचार असल्याच्या वृत्तावर बोलताना उर्मिला यांनी बॉलिवूड हे मुंबईच्या रक्तात आहे. ते असे सहज दूर होऊ शकेल असे वाटत नाही, असे उर्मिला म्हणाल्या.