‘त्या’ दोघांनी घेतल्यानंतरच मी ‘कोरोना’ची लस घेईन, प्रकाश आंबेडकरांना लसीकरणावर शंका ?

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन –   देशभरात आजपासून शनिवार (दि. 16) ऐतिहासिक लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. पण या लसीकरण मोहिमेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनी लस टोचून घेतल्यानंतरच मी लस टोचून घेईन असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

आजपासून मोदींच्या हस्ते देशव्यापी लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात लसीकरण अभियानाचा शुभारंभ झाला. मात्र या लसीकरण मोहिमेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली आहे. दरम्यान दिल्लीत निवासी डॉक्टरांनी देखील लसीबाबत शंका उपस्थित करत लस घेण्यास नकार दर्शवला आहे.

लसीकरणाचा आरंभ करताना काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करताना सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो. ज्याला कोरोना लसीची सर्वांत जास्त गरज आहे, त्यालाच प्राधान्यक्रमाने कोरोना लस मिळणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस यांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. पहिला आणि दुसरा डोस यामध्ये एक महिन्याचे अंतर ठेवले जाणार आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्याने कोरोनाविरोधाची प्रतिकारशक्ती तयार होईल. त्यामुळे निष्काळजीपणा दाखवू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. लसीच्या गुणवत्तेबाबत वैज्ञानिक आणि तज्ज्ञ दोन्ही आश्वस्त झाल्यानंतरच याच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली. कोरोना लसीबाबत केल्या जाणाऱ्या अप्रचाराला अजिबात बळी पडू नका असेही ते म्हणाले.

काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे?

कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना आजपासून लस देण्यास सुरुवात झाली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. कोरोना लस सर्वसामान्य नागरिकांना मोफत मिळणार का, असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मोफत मिळणार आहे. सर्वसामान्यांना लस मोफत मिळणार की नाही, याबद्दलचा निर्णय अद्याप केंद्र सरकारनं घेतलेला नाही. केंद्रानं यासंदर्भातला निर्णय घेतला की मग आम्ही निर्णय घेऊ, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.