‘स्वदेशी’ कोरोना लसींबाबत खुशखबर ! आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली Good News
नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – भारताची कोरोना लस ह्युमन ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. या लशीकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत. ही लस कधी मिळणार याची प्रतिक्षा प्रत्येकाला आहे. आता अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही लस कधी मिळणार याची माहिती दिली आहे. या वर्षा अखेरपर्यंत मेड इन इंडिया कोरोना लस उपलब्ध होईल, असा दावा आरोग्यमंत्र्यांनी केला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही गुड न्यूज दिली आहे.
डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, जगभरात कोरोना लशीचं ट्रायल फास्ट ट्रॅक केलं जात आहे. भारतातील भारत बायोटेकने तयार केलेली कोवॅक्सिन ही लस वर्षाच्या अखेरीस उपलब्ध होऊ शकेल. 2021 च्या पहिल्या तिमाहीत ही लस वापरण्यासाठी तयार असेल. तसेच आयआयसीएमआर आणि भारत बायोटेकने करार केला आहे. त्यामुळे ही लस यशस्वी झाली तर भारातात स्वस्त दरात हे औषध उपलब्ध करुन दिलं जाईल असेही त्यांनी सांगितले.
भारतात 3 लशींवर काम सुरु
जगभरात कोरोनावरील अनेक लसींची चाचणी वेगाने घेतली जात आहे. स्वदेशी लसींची चाचणी या वर्षाखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कोरोनावरील लस बाजारात येण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची आधीच ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस तयार करत आहे. उर्वरीत दोन लसी तयार करण्यासाठी आणि बाजारात येण्यासाठी कमीत कमी एक महिन्यापेक्षा अधिक वेळ लागू शकते. वर्षाच्या अखेरीस या लसी उपलब्ध होतील, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
3 लसींबाबत ताजी अपडेट
ऑक्सफोर्ड लस – भारतात मानवी चाचण्या सुरु केल्या आहेत, असे सीरमने म्हटले आहे. वर्षाच्या अखेरीस अॅस्ट्रॅजेनेका लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.
जायकोव्ह-डी – झायडस कॅडिलाने देखील मानवावर कोरोना लसीची क्लिनिकल चाचणी करणे सुरु केले आहे. काही महिन्यांमध्ये ही चाचणीही पूर्ण होईल.
कोवॅक्सिन – हैदराबादमधील भारत बायोटेकच्या या लसीची चाचणी दोन आठवड्यापूर्वी सुरु झाली आहे. ही लस वर्षाच्या अखेरीसही तयार होऊ शकते.
प्रथम कोणाला लस मिळणार ?
आरोग्यसेवा (हेल्थकेअर) आणि अग्रभागी कामगारांना (फ्रंटलाइन वर्कर्स) सर्वात आधी लस उपलब्ध केली जाईल. त्यानंतर ज्येष्ठ आणि गंभीर आजार असलेल्या रुग्णांना प्राधान्याने ही लस देण्यात येईल, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.
लस मिळण्यासाठी काय आहे योजना ?
भारताला लस उपलब्ध व्हावी या दृष्टीने आरोग्य मंत्रालय योजना आखत असल्याची माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. जगात सर्वात मोठा लस उत्पादक भारत आहे. भारत जगातील लसींच्या गरजेच्या दोन तृतियांश इतका भाग निर्यात करतो, असेही त्यांनी सांगितले. तसेच ICMR आणि भारत बायोटेक यांच्यात सामंजस्य करार झाला आहे, की ही लस यशस्वी झाल्यास भारत सरकारला कमी दरात लस देण्यास प्राधान्य दिले जाईल. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आधीच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीचं उत्पादन करत आहे. जेणेकरुन कमीत कमी वेळेत ही लस बाजारात उपलब्ध करुन देता येईल.