दिग्विजय सिंह पराभूत झाले तर जिवंत समाधी घेईन, ‘या’ महाराजाची प्रतिज्ञा

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळ मतदारसंघात साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध उमेदवारी दिली आहे. भोपाळ मतदार संघातील मतदानाची तारीख जवळ आली असून राजकीय वातावरण अधिकच तापत आहे. दरम्यान पंचायती श्रीनिरंजनी आखाढा महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराजांनी दिग्विजय सिंह यांना पाठिंबा दिला आहे. या महाराजांनी दिग्विजय हे साध्वी यांच्याकडून पराभूत झाले तर जिवंत समाधी घेईन, अशी प्रतिज्ञा घेतली आहे.

गिरी महाराजांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, आज अनेकजण धर्माच्या नावाखाली लोकामध्ये फूट पाडत आहेत. या ठिकाणी सनातन धर्मामध्ये फूट पाडली जात आहे. मात्र, हिदुत्वावरून राजकारण करू नये. सनातन धर्मावरून राजकारण होता कामा नये. त्यामुळे देशातील संत दिग्विजय यांच्या मागे उभे असल्याचे गिरी महाराज यांनी सांगितले.

याच दरम्यान त्यांनी दिग्विजय सिंह यांना पाठिंबा देत असल्याचे सांगत प्रतिज्ञा घेतली आहे. जर दिग्विजय सिंह हे साध्वी प्रज्ञासिंह यांच्याकडून पराभूत झाले तर मी जिवंत समाधी घेईन. तसेच येत्या ५ मेला कामाख्य मातेचा यज्ञ करण्यात येणार आहे. या यज्ञामुळे दिग्विजय सिंह नक्कीच विजयी होतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिह यांना मतदारसंघातील निवडणूकीत कथित हिंदू दहशतवाद्यांचा मुद्दा चर्चेत आणला आहे. दरम्यान साध्वी प्रज्ञा यांच्या पाठिशी भाजप आणि हिदुत्ववादी ताकद आहे. तर दिग्विजय यांना अनेक संतांचा पाठिंबा मिळत आहे.