मायावतींनी लग्न केले असते तर देश एक संकटातून मुक्त झाला असता : संजय राऊत

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात सध्या इलेक्शन फिव्हर आहे. पक्षातील नेत्यांचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला चालू आहे अशातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नाशकातील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना बसपच्या अध्यक्षा मायावती यांच्यावर खासगी आयुष्याबाबत टीका केली मायावती यांच्याविषयी बोलताना राऊतांची जीभ घसरली.

‘मी देशासाठी लग्न केले नाही’ असा दावा करणाऱ्या मायावतींनी लग्न केले असते तर देश एक संकटातून मुक्त झाला असता अशी टीका केली. ज्यांनी लग्न केले नाही, त्या सगळ्यांना देशाचे पंतप्रधान करायचे का, असा सवाल करत मायावती देशाच्या पंतप्रधान झाल्या असत्या तर त्या कशा दिसल्या असत्या, अशा खालच्या शब्दांत त्यांच्यावर टीका केली.

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर देखील राऊत यांनी सडकून टीका केली आहे. ‘साडेतीन वर्षे सरकारी पाहुणचार करून आलेल्या श्रद्धेय, पूजनीय अशा ‘आसाराम बापू’ अन् त्यांच्या कंपूची उर्फ भुजबळ कुटुंबीयांची नाशिककर जबाबदारी घेणार का ‘, असा सवाल राऊत यांनी केला आहे. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील उपस्थिती लावली होती.

यावेळी बोलताना राऊत पुढे म्हणाले, विरोधकांमध्ये एकवाक्यता नसतांना विरोधक राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव करायला निघाल्याची खिल्ली त्यांनी यावेळी उडवली. शिवसेना आणि भाजप एकत्र असून राज्यात आता ‘हम दो आणि हमारे ४८ खासदार’ निवडून येतील असा दावा राऊत यांनी यावेळी केला. नरेंद्र मोदी हे भारताचे शेर असल्याची पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.

या मेळाव्याला गिरीश महाजन यांच्यासह शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, राज्यमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांसह शिवसेना, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.