चुका माणसांकडून झाल्यात, पक्षावर कशाला राग काढतात ?

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळावा पार पडला. यावेळी एकनाथ खडसेंनी पक्षावरील नाराजी उघड केली. यानंतर बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी चुका माणसांकडूनच होतात, पक्षावर कशाला राग काढतात असा सवाल एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना केला. यावेळी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांची समजूत चंद्रकात पाटलांनी काढली.

यावेळी चंद्रकात पाटलांनी सांगितले की, मी नाथाभाऊंच्या वेदना समजू शकतो. त्यांनी दु:ख व्यक्त केलं त्यात चूकीचं काही नाही. आपल्या तक्रारी आणि व्यथांची पक्ष दखल घेईल, त्यावर उत्तर काढू, परंतु भविष्यात सगळं नीट झाल्यावर अपराधी किंवा संकोच वाटेल असे संवेनदशील शब्द वापरु नका. त्याचे ओरखडे राहतात.

चंद्रकात पाटलांनी नाथाभाऊंची समजूत काढताना सांगितले की, नाथाभाऊ तुम्ही जाण्याची किंवा स्वतंत्र पक्ष काढण्याची भाषा करु नका. पक्षाच्या चुका झाल्या नाहीत. चुका माणसांच्या झाल्यात. पक्षावर कशाला राग काढत आहेत. तुम्ही बोला की तू काल आला आहेस, आम्ही पक्षातच राहणार आहे, तू जायचे तर जा, असे तुम्ही आम्हाला म्हणा आणि पक्षात राहून संघर्ष करा.

चंद्रकात पाटलांनी गोपीनाथ मुंडेंबद्दल बोलताना सांगितले की, गोपीनाथ मुंडेंच्या प्रेरणेने आम्ही शरद पवारांना अंगावर घेऊ शकलो. पश्चिम महाराष्ट्रात जास्त जागा जिंकू शकलो. मागील पाच वर्षात गोपीनाथ मुंडेंच्या प्रेरणेने पश्चिम महाराष्ट्रातील जागा वाढल्या. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, गोपीनाथ मुंडे भरल्या ताटावरुन उठून गेले, परंतु मुंडेंच्या जाण्यानंतर त्यांनी खचून न जाता कुटूंबाला समर्थपणे सावरले.

यावेळी एकनाथ खडसेंनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीला उजाळा दिला. दरम्यान बोलताना खडसे म्हणाले की, शेठजी, भटजी पक्ष म्हणून भाजपची ओळख होती. त्याला बहुजनांचा चेहरा देण्याचे काम गोपीनाथ मुंडेंनी केले. भाजपच्या आजच्या नेतृत्वावर मत्सर आणि द्वेषभावना असल्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी राज्यातील भाजपवरील नाराजी जाहीर व्यक्त केली.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/