‘नया पाकिस्तान म्हणता , मग दहशतवाद्यांवर नयी अ‍ॅक्शन घ्या’ : भारताने केली पाकची कानउघडणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजचा पाकिस्तान हा ‘नया पाकिस्तान’ ‘नयी सोच का पाकिस्तान’ आहे असा दावा पाकिस्तानमधील राजकीय नेत्यांकडून केला जातो या मुद्द्यावरून भारतीय परराष्ट्र खात्यानं चांगलीच कानउघडणी केली आहे . एअर स्ट्राईकनंतर अनेकदा पाककडून अनेक दावे करण्यात आले . यातील बरेच दावे हे खोटे निघाले. त्यामुळे पाकचा खोटारडेपणा उघड झाला आहे. भारताचे दोन विमानं पाडल्याचा पाकचा दावाही खोटा असल्याचं परराष्ट्र खात्याचे सचिव रवीश कुमार यांनी सांगितले.

याबाबत बोलताना रवीश कुमार म्हणाले की , “नया पाकिस्तान म्हणता , मग दहशतवाद्यांवर नयी अ‍ॅक्शन घ्या.” पाकिस्तानकडून सातत्याने भारताची दोन विमाने पाडल्याचे सांगण्यात येते , मग पाक त्याचे पुरावे का देत नाही ? कुठंय ते व्हिडीओ रेकॉर्डींग, कुठंय त्याची सत्यता ? असा सवाल रवीश कुमार यांनी उपस्थित केला . नया पाकिस्तान म्हणणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांना त्यांनी चांगलंच फटकारलं . नवी दिल्ली येथे आज भारतीय परराष्ट्र खात्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली . यावेळी परराष्ट्र खात्याने पाकिस्तान सरकारला लक्ष्य केले.

‘ पाकिस्तान सरकार जैशच्या प्रवक्त्यासारखं वागतंय ‘

पाकिस्तान सरकार हे जैशच्या प्रवक्त्यासारखं वागतंय हे सांगताना भारतीय परराष्ट्र खात्याने म्हटले की, “भारतानं एफ-१६ पाडलं. त्याचे पुरावेही दिलेत, त्यावर पाकिस्तान काहीच का बोलत नाही ? मसूद अझहर पाकिस्तानमध्येच असल्याचं त्यांचे परराष्ट्र मंत्री मान्य करतात, पण त्याच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैशनं स्वीकारली आहे, हे पाकिस्तान का विसरतंय ?” असेही भारताने म्हटले आहे.