वर्षां निवासस्थानी निर्णय घेतले तर बिघडले कुठे ? : अजित पवार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना कालावधीत विरोधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून काम करतात, अशी टीका करीत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत बसून निर्णय घेतात, मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षां शासकीय निवासस्थानी निर्णय घेतले, तर बिघडले कुठे, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला विधानपरिषदेत केला.

सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना पवार यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्र्यांचे चांद्यापासून बांद्यापर्यंत राज्यातील प्रत्येक विभागाकडे बारीक लक्ष आहे. पंतप्रधानांप्रमाणे ते प्रत्येक विभागातील अधिकारी व संबंधितांशी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून बोलून निर्णय घेत आहेत. कोरोनाचा मुकाबला राज्य सरकार समर्थपणे करीत आहे. केंद्राकडून राज्याच्या हिश्श्याचे 22 हजार कोटी रूपये मिळालेले नाहीत.

तरीही राज्य सरकार निधीतून मोठी आर्थिक मदत देत आहे. जिल्हा नियोजन समित्यांच्या माध्यमातून 3244 कोटी रूपयांचा निधी वितरीत केला आहे. त्यापैकी 50 टक्के कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी आहे. केंद्र सरकार आता पीपीई किट, औषधासाठी निधी देणार नसल्यामुळे तो भारही राज्य सरकारला उचलावा लागणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.