‘फडणवीस सरकारनं आरोग्यविषयक काम केलं असतं तर…’, पत्रकाराच्या मृत्यूवरून शिवसेनेची भाजपवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पत्रकार पांडुरंग रायकर आणि दत्ता एकबोटे यांचं पुण्यात कोरोनामुळं निधन झाल्यानंतर आता शिवसेनेनं भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरोग्यविषयक काम केलं असतं तर आतासारखी जंबो सेंटर्स उभारण्याचं काम कमी झालं असतं असं शिवसेनेनं म्हटलं आहे. विशेष बाब अशी की, मागील सरकारच्या काळात हे खातं 5 वर्ष शिवसेनेकडंच होतं. शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मागील सरकारवर टीका करण्यात आली आहे.

काय लिहलंय सामनाच्या अग्रलेखात ?
मागच्या 5 वर्षात फडणवीस सरकारनं आरोग्यविषयक काम केलं असतं. आज ज्या तात्पुरत्या सुविधा जंबो म्हणून उभाराव्या लागल्या ते प्रमाण कमी झालं असतं. विरोधी पक्षांच्या टीकेचा, आरोपांचा मुख्य भर हा जंबो कोविड केंद्रावरच आहे. ही केंद्रे व्यवस्थित चालू द्यायची नाहीत, त्यात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स यांच्यावर दबाव आणून दहशत निर्माण करायची असं राजकीय धोरण राज्याच्या गंभीर स्थितीत धोकादायक आहे. पुण्यातील राजकारण्यांनी याचं भान ठेवलं तर पांडुरंग रायकर, दत्ता एकबोटे यांना जे भोगावं लागलं ते इतरांच्या नशीबी येणार नाही असा निशाणा शिवसेनेनं भाजपवर साधला आहे.

‘…तरच कोरोनासोबत नीट लढता येईल’
यात पुढं असं लिहलंय की, “आरोग्यविषयक आणीबाणीच्या स्थितीत दुर्दैवानं अनेक गोष्टी या काही काळ नियंत्रणाबाहेर जातात. परंतु परिस्थितीवर नियंत्रण आणून पुन्हा सगळं स्थिरस्थावर करणं हाच राज्यकर्त्यांचा पुरुषार्थ ठरतो. पुण्यात आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे वर सरकार किंवा महानगरपालिका अपयशी ठरत आहे असं रोज बोंबलण्यानं काही पक्षांना राजकीय प्रसिद्धी मिळेल परंतु अशानं कोरोना काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या यंत्रणांचे खच्चीकरण होत असतं. पुण्यातील महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. शहरात भाजपचे आमदार, खासदार आहेत. या सगळ्यांनी शहराच्या सुरक्षेसाठी जर एकदिलानं काम केलं तरच कोरोनासोबत नीट लढता येईल” असंही यात म्हटलं आहे.