एटीएम ट्रान्झॅक्शन फेल… आणि पैसेही कट.. तर ‘हे’ नियम माहित असू द्या..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजकाल एटीएमचा वापर वाढला आहे. सोबत कॅश बाळगण्यापेक्षा नागरिक एटीएमच्या वापरला अधिक पसंती देऊ लागले आहेत. कधीकधी एटीएममधून पैसे काढताना अनेकदा अकाऊंटमधून पैसे डेबिट झाल्याचा मेसेज येतो. मात्र एटीएम मशीनमधून पैसे बाहेर येतच नाहीत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, याविषयी २०१८ मध्ये अशाप्रकारच्या तब्बल १६ हजार तक्रारी आल्या होत्या. तर या वर्षी त्या तक्रारींमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जर तुमचेही एटीएम ट्रान्झॅक्शन फेल झाले असेल आणि पैसे परत आले नसतील, तर तुम्ही खालील नियमांद्वारे ते परत मिळवू शकता.

त्वरित बँकेशी संपर्क करा –

खातेधारकाने आपल्या बँकेचे एटीएम किंवा अन्य कोणत्याही एटीएममधून पैसे काढताना कॅश आलीच नसेल आणि पैसे कट झाले असतील तर कोणत्याही बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन संपर्क करायला हवा. तुमची तक्रार नोंदवून घेतली जाईल आणि एक आठवड्याची मुदत तुम्हाला दिली जाईल.

ट्रांझेक्शन स्लिप घ्या –

ट्रांझेक्शन फेल झाले असले तरीही त्याची स्लिप तुम्हाला सोबत ठेवावी लागेल. त्यामुळे एटीएममधून रिसिप्ट घ्यायला कधी विसरू नका. ट्रांझेक्शन स्लिपमध्ये एटीएमचा आयडी, लोकेशन, वेळ आणि बँकेकडून मिळालेला रिस्पॉन्ड कोड प्रिंट झालेला असतो.

तक्रार नोंदवा –

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, प्रत्येक एटीएममध्ये संबंधित अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक, टोल फ्री क्रमांक, हेल्प डेस्क क्रमांक असणे अनिवार्य आहे. त्यावर संपर्क करुन तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

२४ तासाचा अवधी –

ग्राहका आपल्या बँकेतून पैसे काढण्यास गेला आणि एटीएममधून कोणत्या कारणात्सव रक्कम न निघाल्यास 24 तास अवधी द्यावा लागतो. बँकेकडून झालेल्या चुकीचे २४ तासात निराकरण होते आणि पैसे क्रेडिट केले जातात

७ दिवसात पैसे जमा करणे अनिवार्य –

जर एटीएम ट्रान्झॅक्शन फेल झाल्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे कापले गेले असतील, तर बँकेला सात कामाच्या दिवसांत ते पैसे तुमच्या खात्यात पुन्हा जमा करणे अनिवार्य आहे.

बँक देईल रोज १०० रूपये भरपाई –

तक्रार केल्याच्या सात दिवसांच्या आत जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. तर, बँकेला दर दिवसाला १०० रुपये इतकी भरपाई ग्राहकाला द्यावी लागते. यासाठी ग्राहकाला दावा करण्याची गरज नसते. मात्र, भरपाईसाठी ग्राहकाला ट्रान्झॅक्शनच्या ३० दिवसांच्या आत तक्रार दाखल करणे गरजेचं आहे.

लोकपालाकडे तक्रार करा –

जर निश्चित वेळेत तुमच्या समस्येचं समाधान झालं नाही. तर बँकेकडून उत्तर मिळाल्याच्या ३० तीस दिवसांच्या आत तुम्ही बँकेच्या लोकपालकडे यासंबंधी तक्रार करु शकता.