…म्हणून कंत्राटदार प्रेमाची, बालहट्टाची लाट आवरा, भाजप नेते शेलार यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   खारे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही म्हणून ठाण्यातून रद्द केला. मग,असा प्रकल्प 200 पट अधिक खर्च करुन मुंबईला तरी कसा परवडणार? वाढवण बंदर जर समुद्री पर्यावरणाला घातक असेल, तर मुंबईचा प्रकल्पही घातक ठरु शकतो? म्हणून कंत्राटदार प्रेमाची, बालहट्टाची लाट आवरा, अशा शब्दांमध्ये भाजपा नेते आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

बुलेट ट्रेनची सुरुवात होणाऱ्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत मेट्रोची कारशेड उभारण्यासाठी चाचपणी सुरू झाली असतानाच, केंद्र सरकारच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या डहाणूजवळील वाढवण बंदराला राज्य सरकारकडून सहकार्य मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. यावरून आता राज्य व केंद्र सरकारमध्ये नवा वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

डहाणूजवळ वाढवण येथे मोठे बंदर उभारण्यात येणार असून, या बंदराला स्थानिक जनता तसेच मच्छीमारांचा विरोध आहे. या बंदराला विरोध करण्याकरिता दोन दिवसांपूर्वी मुंबईपासून पालघरपर्यंत मच्छीमारांनी बंदही पाळला होता. बंदर विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते. दरम्यान या प्रकल्पाबाबत आम्ही स्थानिक जनता व मच्छीमारांच्या बरोबर आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंदर विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिल्याने राज्य सरकार कठोर भूमिका घेणार, असेच संकेत मिळत आहेत.