…तर बारामतीमध्ये तुम्हाला हरवलं असतं : भाजपचे नेते चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादीला फक्त ५ जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर काल रात्री झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी ईव्हीएम यंत्रणेबाबत शंका व्यक्त केली होती. त्यावर भाजपचे नेते मधु चव्हाण यांनी पवार यांच्या शंकेवर टीका केली आहे.

ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस पार्टी विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती, असं वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यावर मधु चव्हाण यांनी आक्रमक उत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे शरद पवार निराश झाले आहेत. त्यांना हा पराभव पचवता येत नाही, असं मधू चव्हाण यांनी म्हटलं.

शरद पवार यांचे वय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांची जागा बघून त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांचे हे विधान केवळ हास्यास्पदच नाही, तर यामुळे त्यांची उरलीसुरली विश्वासर्हता संपुष्टात येऊ शकते. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी तीन राज्य गमावण्याइतकी भाजपा बिनडोक आहे का? आम्हाला ईव्हीएममध्ये घोळ करायचा असता तर बारामतीमध्ये तुम्हाला हरवलं असतं, असं मधु चव्हण यांनी म्हटलं. तसंच ज्या केरळमध्ये आमच्या कार्यकर्त्यांचं रक्त सांडलय तिथे आम्ही पाच-दहा जागा मिळवल्या असत्या, काश्मीर खोऱ्यातल्या लोकसभेच्या दोन-तीन जागा मिळवल्या असत्या, असे सुचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव त्यांना पचवता येत नसावा. त्यामुळे ते अशाप्रकारची हास्यास्पद विधाने करत आहेत. त्यांनी हे वक्तव्य कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी केले असेल तर ते एकवेळ क्षम्य असेल. मात्र, लोकांनी त्यांना खरंच गांभीर्याने घ्यावं, असे वाटत असेल तर त्यांनी अशी वक्तव्ये करणे थांबवायला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.