बुरख्याबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जावेद अख्तर यांचा ‘यु टर्न’ म्हणाले …

भोपाळ : वृत्तसंस्था – सुरक्षेच्या दृष्टिकोणातून श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटानंतर बुरखा, नाकाब यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेया ‘सामना’ मधून भारतातही बुरखाबंदी करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर मात्र या बुरखाबंदीच्या प्रकरणावरून एकच वादळ उठले. यावरून उलट -सुलट चर्चाना ऊत आले.

अशातच प्रसिद्ध गीतकार जावेत अख्तर यांनी देखील याबाबत आपली प्रतिक्रिया गुरुवारी (2 मे) रोजी दिली होती. बुरख्यावर बंदी घालण्याबरोबरच राजस्थानमधील घूंघट प्रथेवरही बंदी घालावी, महिला सक्षमीकरणासाठी ते आवश्यक आहे असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. बुरख्यावर बंदी घालण्याला आपला कोणताही आक्षेप नसून, केंद्र सरकारने राजस्थानात होत असलेल्या 6 मेच्या मतदानापूर्वी घुंगट प्रथेवरही बंदी घालावी, असे वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते.

माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला
मात्र आता माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला असे सांगत त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “काही लोक माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी असे म्हटले होते की, श्रीलंकेत हे सुरक्षेच्या दृष्टीने केले गेले असेल, मात्र खरं तर हे महिला सक्षमीकरणासाठी गरजेचे आहे. चेहरा झाकणे बंद व्हायला हवे, मग तो नकाब असो वा घुंगट.” असं ट्वीट जावेद अख्तर यांनी शुक्रवारी पहाटे केले आहे.

मी कधीही घरामध्ये बुरखा पाहिलेला नाही
याबाबत बोलताना जावेद अख्तर यांनी स्वतःच्या घरातील उदाहरण देत संगितले की, ‘बुरख्याबाबत माझे ज्ञान खूपच कमी आहे कारण ज्या घरात मी राहिलो त्या घरातील सर्व स्त्रिया या कामावर जाणाऱ्या होत्या. मी कधीही घरामध्ये बुरखा पाहिलेला नाही. इराक हा मोठा कट्टर देश आहे. मात्र, तिथे महिला आपला चेहरा झाकत नाहीत. श्रीलंकेत जो कायदा आला आहे, त्यानुसार तुम्ही तुमचा चेहरा झाकू शकत नाही. बुरखा वापरा, मात्र चेहरा झाकलेला असता कामा नये. हे त्यांनी कायद्यात अंतर्भूत केले’ असं म्हटले आहे.