अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल… 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणूक लढणार नाही असे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी आपल्या आजोबांना त्यांच्या निर्णयाबाबत पुर्नविचार करावा अशी भावनिक साद तर घातलीच आहेत. त्याचबरोबर शरद पवार यांच्या लोकसभेतून माघार घेण्यावरून ज्या चर्चा होत आहेत त्याबाबत देखील सडेतोड उत्तरं दिली आहेत.

https://www.facebook.com/RohitPawarOfficial/
शरद पवार यांनी लोकसभेतून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “देशात सध्या मोदींचीच लाट आहे. शरद पवारांना याचा अंदाज आलेला आहे. त्यांना बदललेल्या हवेचा अंदाज कळतो. त्यामुळेच शरद पवारांनी माढातून माघार घेतली आहे”. असे विधान केले होते त्यांना उत्तर देताना रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हंटले आहे की,  “बाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलच आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसही बेडकासारखं हवा भरून बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल”. असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले आहे.

काय आहे रोहित पावर यांची फेसबुक पोस्ट 
“राजकारणातले मोठमोठ्ठे लोक साहेबांच्या राजकारणाचा गौरव करत असताना काय म्हणतात हे आपणाला माहितच आहे पण सर्वसामान्य लोकं काय म्हणतात याकडे पवार साहेब नेहमीच लक्ष देतात. म्हणूनच गेली 52 वर्ष फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात देखील हिच एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभा राहू शकते अस सर्वसामान्य माणसांच मत आहे.
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा हा प्रवास भेदभावाच, जातीधर्माचं राजकारण न करता, गेली 52 वर्ष न थकता सर्वसामान्यांसाठी सुरू आहे, म्हणूनच पवार साहेबांच राजकारण कोणत्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून चालू होतं. हे मला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या दिवशीच अभिमानाने सांगू वाटतं.
एक कार्यकर्ता म्हणून,
“साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा.”
बाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलच आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसही बेडकासारखं हवा भरून बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल.