खा. डॉ. सुजय विखेंचा महाविकासला टोला, म्हणाले – ‘पैसेच कमवायचे तर मंत्री कशाला ठेकेदार व्हा’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांबाबत काँग्रेस नेते यशवंतराव गडाख यांनी केलेल्या विधानावर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी समर्थन देत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे माझे राजकीय गुरू आहेत. त्यांनी जे काही सांगितले, ते खर आहे. हे लोक एकीकडे सामान्यांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगतात. पण मलईदार खात्यावरून यांच्यात रोज भांडण होत आहेत.

त्यामुळे पैसे कमवायचे असतील तर मंत्री होण्यापेक्षा ठेकेदार व्हा, अश्या शब्दात विखे यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर टीका केली आहे. अहमदनगर महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीनंतर खासदार विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत आपले मत मांडले. तसेच विखे पुढे म्हणाले कि, गडाख यांनी जे वक्तव्य केले आहे, त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. कुठलाही वैचारिक राजकारणी असेच म्हणेल.

हे तिन्ही पक्ष जनतेच्या सेवेसाठी नाहीतर स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. पक्ष जरी एकत्र आले तरी कार्यकर्ते अजून एकत्र आलेले दिसत नाही. मंत्र्यांच्या कामावरुन त्यांची ओळख निर्माण व्हायला हवी, पण इथे नाराजीनाट्य सुरू आहे. सातबारा कोरा करू देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते. पण रोज नवीन जीआर येत आहेत. एखाद्या प्रश्नांवर या तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले नाही तर त्यातून अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात, असेही सुजय विखे पाटील यांनी म्हंटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/