8 वर्षानंतर एटीएमच्या शुल्कामध्ये होऊ शकतो ‘हा’ बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येत्या काही दिवसांत एटीएममधून 5 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास त्यावर तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावं लागू शकतं. हा नवा नियम सध्याच्या पाच मोफत व्यवहारांमध्ये समाविष्ट असणार नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएम शुल्काच्या समिक्षेबाबत जून महिन्यांत एक समिती नेमली होती, या समितीने आपल्या सिफारशी बँकेकडे सोपवल्या आहेत.

एटीएममधून एकाच वेळी पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास ग्राहकाला 24 रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकते. सध्या एटीएममधून पाच मोफत व्यवहार करता येऊ शकतात. त्यानंतर जर त्याच महिन्यात सहावा व्यवहार झाला तर त्यावर ग्राहकाला वीस रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. आरबीआयने नेमलेल्या समितीच्या शिफारशींनुसार आठ वर्षानंतर एटीएमच्या शुल्कामध्ये बदल होऊ शकतो. मध्य प्रदेशचे एलएलबीसी समन्वयक एसडी माहुरकर यांच्या माहितीनुसार, समितीने दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये एटीएममधून व्यवहार वाढवण्यावर भर दिला आहे.

या ठिकाणी जास्त करुन लोक लहान रक्कम काढतात. यासाठी समितीने नव्या नियमांनुसार लहान व्यवहारांनाच मोफत व्यवहारांमध्ये ठेवलं आहे. छोट्या शहरांमध्ये ग्राहकांना दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून प्रत्येक महिन्याला सहा वेळा पैसे काढण्याची सूटही या नव्या नियमामुळे मिळू शकते. सध्या छोट्या शहरांमध्ये केवळ पाच वेळाच पैसे काढता येतात. मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली सारख्या महानगरांमध्ये ग्राहकांना एका महिन्यांत एटीएममधून तीन वेळा पैसे काढण्याची सूट आहे. यानंतर चौथ्यांदा पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क लागते.