नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दुष्काळाचे चटके बसणाऱ्या आम जनतेला आता उन्हापासून थोडा दिलासा मिळणार आहे. कारण लवकरच देशभरात पाऊस हजेरी लावणार आहे. असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. अल निनोचा प्रभाव कमी झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तसेच पुढील महिन्यात देखील अल निनोचा प्रभाव कमी होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
त्यामुळे आता देशातील नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यंदा ९६ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे योग्य प्रमाणात पाऊस पडला नाही. दरम्यान , जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात हवामान विभागाकडून मान्सूनसंदर्भातील पुढील माहिती दिली जाणार आहे.
अल निनो आणि पावसाचे कनेक्शन काय ?
पाऊस किती पडणार यावर आर्थिक गणितं अवलंबून असतात. अल निनोमुळे समुद्री वाऱ्यांची दिशा बदलली जाते. परिणामी, ज्या क्षेत्रात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता असते तेथे पाऊस पडत नाही आणि याउलट जेथे विरळ पावसाचा अंदाज वर्तवलेला असतो, तेथे मुसळधार पाऊस पडतो. प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्यास देशातील कित्येक क्षेत्रांतील आर्थिक आकड्यांमध्ये सुधारणा होईल. यामुळे सर्वसामान्याचं महागाईमुळे कंबरडं मोडणार नाही.