‘अम्फान’चा परिणाम : 2 राज्यांमध्ये प्रचंड नुकसान होण्याची शंका, 8 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस

कोलकाता : वृत्तसंस्था – चक्रीवादळ अम्फान बुधवारी दुपारपासून संध्याकाळ दरम्यान पश्चिम बंगालच्या दिघा किनाऱ्यावर धडकेल. यावेळी ताशी १८० किलोमीटर वेगाने वारा येईल आणि जोरदार पाऊस होईल. पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागातून तीन लाख लोकांना हलवण्यात आले आहे.

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) पश्चिम बंगालसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या वादळामुळे कोलकाता, हुगळी, हावडा, दक्षिण आणि उत्तर २४ परगणा आणि मिदनापूर जिल्ह्यात मोठे नुकसान होऊ शकते.

आयएमडीने इशारा दिला आहे की, ओडिसा किनाऱ्यावर वादळ आल्यामुळे राज्याच्या १२ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वादळामुळे सहा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर देशातील सर्वात छोटे राज्य सिक्कीमला देखील चक्रीवादळाचा फटका बसेल, तेथे बर्‍याच भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्याच्या सखल भागात हलका पाऊस होईल.

हवामान विभागाने म्हटले आहे की, आसाम आणि मेघालयच्या काही भागात २१ मे पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दक्षिण भारतातील दोन राज्ये केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच बिहारमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आयएमडीने सांगितले की, १५ मे रोजी विशाखापट्टणमपासून ९०० किमी दूर दक्षिण-पूर्वेस दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे आणि नंतर खोल कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ लागले. १७ मे रोजी जेव्हा ते दिघापासून १२०० किमी लांब होते, तेव्हा ते चक्रीवादळाच्या रूपात बदलले आणि उत्तर-उत्तर पश्चिमच्या दिशेने ताशी ८ किमी वेगाने वाढू लागले. त्यानंतर १८ मे रोजी संध्याकाळी ते एका मोठ्या चक्रीवादळाच्या रूपात बदलले.

हवामान खात्याचे महासंचालक डॉ. मृतुंजय महापात्रा यांनी सांगितले की, सुपर सायक्लोन केरळमध्ये मान्सूनचे आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून १ जूनऐवजी ५ जून रोजी दाखल होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. अशाप्रकारे देशाच्या इतर भागात मान्सून चार दिवस उशिरा पोहोचेल. दरम्यान वादळामुळे ओडिसा, केरळ, आसामसह १० राज्यात पाऊस पडत आहे.

हवामान खात्यानुसार, उत्तर आणि मध्य भारतात चक्रीवादळाचा परिणाम होणार नाही. मात्र, जेव्हा ते सागर बेटाच्या सभोवतालच्या जमिनीवर आदळेल तेव्हा वाऱ्याचा वेग १६५ किमी असेल. मध्य प्रदेशच्या रीवा, शहडोल, सागर, जबलपूर येथे हलका पाऊस होऊ शकतो. तसेच मंगळवारी दुपारी ताशी २००-२४० किमी वेगाने वाऱ्यासह ते शिगेला पोहोचले.

हवामान खात्याने कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एनसीएमसीच्या बैठकीत सांगितले की, वादळामुळे सर्वात जास्त नुकसान पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या सहा जिल्ह्यांमध्ये होईल.