मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत-पाकिस्तान शांततेवर चर्चा होईल : इम्रान खान

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – देशात लोकसभा निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरु आहे. त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे असं म्हटलं आहे. तसंच काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास चर्चा होणं अशक्य असल्याचंही मत व्यक्त केलं आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमिवर इम्रान खान यांचे हे वक्तव्य मोठे ठरू शकते. भारतात गुरुवारपासून लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात होणार आहे.

आपल्याला दोन नरेंद्र मोदी पहायला मिळणार आहे, असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. एक निवडणुकीआधीचे आणि एक निवडणुकीनंतरचे असतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं. जर आम्ही उत्तर दिलं नसतं तर लोकांकडून आमच्यावर प्रचंड टीका झाली असती. जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर कोणतंही सरकार पाकिस्तानात टिकू शकत नाही, असं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत, असं त्यांनी म्हटलं.

तसंच एका वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्याने डझनहून जास्त दहशतवाद्यांना अटक केले आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर खरचं अंडरग्राऊंड झाला आहे. तो सध्या नेतृत्व करत नाही, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

दरम्यान, पुलवामा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. त्याचा बदला घेत भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करत बालाकोट येथील दहशतवादी स्थळांवर हल्ला करत दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या सर्व घडामोडींनंतरही इम्रान खान यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.