इम्रान खान स्वदेशातच ‘एकाकी’, जनाधारही नाहीसा झाला ! संसदेनंतर रॅलीतही लोकांकडून ‘गो बॅक’

लाहोर : वृत्तसंस्था – भारताने कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने द्वेषापोटी आणि उथळपणे अनेक चुकीचे निर्णय घेत स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आता आपल्याच देशात अक्षरशः एकटे पडले आहेत. काश्मीर प्रश्नामुळे ओढवून घेतलेली वाईट आर्थिक परिस्थिती आणि भारताविरोधात वक्तव्यामुळे तेथील जनतेने त्यांच्याविरोधातच मोर्चा उघडला आहे. संसदेनंतर आता पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागात सामान्य लोकही इम्रान खानचा यांचा निषेध करत आहेत आणि त्यांना गो बॅकच्या घोषणा देत आहेत.

दरम्यान काश्मीरच्या समर्थनार्थ शुक्रवारी मुझफ्फराबाद येथे इम्रान खानचा यांची एक रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र कार्यक्रमापूर्वी लोकांनी यास विरोध दर्शविताना मोठ्या जमावाने ‘गो नियाझी गो बॅक’ चा जयघोष केला. मिळालेल्या माहितीनुसार नियाझी हे इम्रान खान यांचेच नाव आहे.

नियाझी नावाचा इतिहास :
इम्रानच्या नावाशी जोडलेले नियाझी हे नाव पाकिस्तानच्या लोकांना १९७१ च्या युद्धात भारताकडून मिळालेल्या लज्जास्पद पराभवाची आठवण करून देते. पाकिस्तानी लष्कराचे तत्कालीन कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी यांनी १६ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय सैन्य कमांडर लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा यांच्यासमोर शस्त्रे ठेवत हार पत्कारली.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागात राहणारे नियाझी पख्तून आहेत. पाकिस्तानात ते बहुतेक मीनवाली येथे राहतात. जरी आमिर अब्दुल्ला नियाझी आणि इम्रान खान नियाझी दोघांचा जन्म लाहोरमध्ये झाला होता.

इम्रान यांचा ‘फ्लॉप शो’ :
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी या कार्यक्रमामध्ये कोणतीही लक्षणीय गर्दी नव्हती आणि सर्वसामान्य लोक या कार्यक्रमापासून दूर राहिले. तेथील जागा भरण्यासाठी प्रशासनाने सरकारी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हजर राहण्यास सांगून गर्दी जमवली. कोणीही या कार्यक्रमास महत्त्व दिलेले दिसले नाही काही लोकांनी याला फ्लॉप शो म्हटले.

गुरुवारीसुद्धा जेव्हा राष्ट्रपती आरिफ अल्वी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करत होते, तेव्हा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी इमरानवर निशाणा साधत ‘गो नियाझी गो’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली होती.