दुर्दैवी ! कोकणात बाप्पाला निरोप देताना 3 जण बुडाले

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात पोहोचलेल्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणेश विसर्जनाला गालबोट लागले असून जिल्ह्यामध्ये 3 जण विसर्जन करताना बुडाले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांवर दु:खाचे आभाळ कोसळले आहे.

रत्नागिरीजवळील टाकळी येथे काजळी खाडीत गणपती विसर्जन करताना सत्यवान पिलांकर आणि विशाल दिनकर हे दोघेजण बुडाले होते. स्थानिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते खाडीमध्ये वाहून गेले. त्यामुळे उशिरापर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता. दीड दिवसांचा गणेश विसर्जनाच्या वेळी मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे विसर्जन करतेवेळी 28 वर्षांचा युवक बुडाला आहे. अविनाश शिगवण असे त्याचे नाव आहे. हा प्रकार गदा पुलानजीक घडला त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. रत्नागिरी जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गणेश विसर्जन करताना तीन जण बुडाली आहेत. मात्र, अजून पर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे ते जिवंत आहेत की त्यांचा मृत्यू झाला याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. बेपत्ता तरुणांचे शोध कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, सकाळपर्यंत कुठेही ते आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे.