13 व्यासाठी निघालेल्यांवर काळाचा घाला, एकाच कुटूंबातील चौघांचा जागीच मृत्यू, 2 चिमुकल्यांचा समावेश

वरूड (अमरावती) : पोलीसनामा ऑनलाइन – नातेवाईकांच्या तेराव्यासाठी जात असताना भरधाव वेगात जाणाऱ्या प्रवासी वाहनाची धडक दुचाकीला बसून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. अपघातानंतर प्रवासी वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. सुदैवाने त्यामध्ये प्रवासी नव्हते. हा अपघात आज (गुरुवार) सकाळी साडे दहाच्या सुमारास वरुड तालुक्यातील राजुराबाजार मार्गावर झाला.

प्रकाश रामकिसन सोनारे (वय -45), जयश्री प्रकाश सोनारे (वय – 40), जयकुमार ऊर्फ आयुष प्रकाश सोनारे (वय -10) व वैष्णवी प्रकाश सोनारे (वय – 6 सर्व रा. मालखेड, पो. धनोडी, ता. वरूड) अशी मृतांची नावे आहेत. सोनारे कुटुंब दुचाकीवरून (एमएच २७ एन ५९०) वर्धा जिल्ह्यातील वर्धमनेरी येथे नातेवाइकाच्या तेराव्यासाठी निघाले होते. मालखेड गावाच्या पुढे वरूडहून राजुराबाजार मार्गाने जात असताना मानेकर यांच्या शेताजवळ त्यांच्या दुचाकीला प्रवासी वाहनाची (एमजीएस १०६१) जबर धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील सोनारे कुटुंब दुचाकीसह रस्त्यावरून फेकले गेले. त्यात चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी वाहन झाडावर धडकून उलटले. अपघातानंतर चालक घटनास्थळाहून पळून गेला. अपघातावेळी चारचाकी वाहनात प्रवासी नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अपघातानंतर नागरिकांनी सर्वांना वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच चौघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. जयकुमार सोनारे वरुड येथील एन.टी.रडके हायस्कूलमध्ये पाचवीत शिकत होता. आरोपी वाहन चालकाला तात्काळ अटक करावी यासाठी नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. त्यामुळे या ठिकाणी काहीवेळ तणावाचे वातावरण होते. आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. पुढील तपास वरुड पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com