दिलासादायक ! ‘भारत बायोटेक’च्या ‘लशी’चे प्राथमिक निष्कर्ष ‘आशादायी’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या लसीसंदर्भात भारत बायोटेक या कंपनीने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था व आयसीएमआर यांच्या सहकार्याने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या मानवी चाचण्यातील पहिल्या टप्प्यांचे निष्कर्ष आशादायी असल्याचे रोहतक येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेतील प्रमुख संशोधक डॉ. सविता वर्मा यांनी सांगितले आहे.

पहिल्या टप्प्याच्या दुसर्‍या भागात आणखी सहाजणांना कोव्हॅक्सिन ही लस टोचण्यात आली. त्यामुळे आता पहिला टप्पा पूर्ण झाला असून देशात एकूण पन्नासजणांना लस देण्यात आली. त्याचे निष्कर्ष उत्साह वाढवणारे आहेत. रोहतक येथे पहिल्या टप्प्याची सुरुवात 17 जुलैला करण्यात आली होती. त्या दिवशी तीनजणांना लस टोचण्यात आली. कोरोनावरील ही लस दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात एका 30 वर्षांच्या व्यक्तीलाही देण्यात आली होती. कोव्हॅक्सिनचा पहिला टप्पा व दुसरा टप्पा यातील चाचण्या पूर्ण होण्यास 1 वर्ष तीन महिने लागणार आहेत.

कोव्हॅक्सिन या लशीला मानवी चाचण्यासाठी भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली होती. याशिवाय झायडस कॅडिला कंपनीने तयार केलेल्या लशीच्या चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत. कोव्हॅक्सिनची निर्मिती सार्स सीओव्ही 2 विषाणूच्या मृत कणांपासून करण्यात आली असून त्यामुळे विषाणूची लागण होत नाही, पण तरी प्रतिपिंड तयार होतात. दरम्यान, पहिल्या टप्प्यात 18-20 लोकांच्या गटावर प्रयोग करण्यात आले असून त्याची माहिती संकलित करून माहिती व सुरक्षा निरीक्षण केंद्राकडून त्याची शहानिशा केली जाणार आहे.