India China Faceoff : राहुल गांधींनी यामध्ये राजकारण करू नये, LAC वर जखमी झालेल्या जवानाच्या वडिलांनी सुनावलं (व्हिडीओ)
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत – चीन दरम्यान पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशात चीन विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले कि, भारताची एकही इंच जमीन कोणाच्या ताब्यात नाही आणि कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली नाही. भारताकडे कोणीही वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करू नये. चीनने तसा प्रयत्न केल्यानंतर भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.’ मात्र, दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
देशासाठी शहीद झालेल्या 20 जवानांच्या मृत्यूवरून आता देशात राजकीय युद्ध सुरु झालं आहे. हे पाहता गलवान खोऱ्यात संघर्षादरम्यान जखमी झालेल्या एका जवानाच्या वडिलांनी राहुल गांधी यांना अश्या परिस्थितीत राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे. जखमी जवानाच्या वडिलांनी म्हंटले कि, ‘भारतीय लष्कर चीनचा प्रभाव करण्यास सक्षम आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी राजकारण करू नये. माझा मुलगा लष्करात लढला आणि यापुढेही लढत राहिल’.
The Indian Army is a strong army and can defeat China. Rahul Gandhi don’t indulge in politics in this…my son fought in the army and will continue fighting in the army: Father of injured Indian soldier who fought in #GalwanValleyClash (Amateur Video Source) pic.twitter.com/uGOdM2dJkM
— ANI (@ANI) June 20, 2020
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताकडे कोणीही वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करू नये. चीनने तसा प्रयत्न केल्यानंतर भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. सरकारने सीमेपलीकडून येणाऱ्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कराला योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. भारताची कुरापत काढण्याचा कोणी विचारही करू नये. भारताने राजनैतिक पातळीवरून आपली भूमिका चीनच्या कानावर घातली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, भारत आणि चीन यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यातीलच एक भाग म्हणजे देशभरात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची वाढती मागणी. लोकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या स्मार्टफोनमधून चीनी अॅप्स काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनेक व्यवसायीकांनी ई-कॉमर्स कंपन्यांनी चीनमध्ये तयार झालेल्या वस्तूंची विक्री करण्याची बंदी घालावी अशी मागणी लावून धरली आहे. माहितीनुसार, भारताने जर चीनविरुद्ध हे अभियान कायम केलं केलं तर चीनला 17 अब्ज डॉलरचा फटका बसू शकतो. चीनमधून भारतात होणाऱ्या एकूण आयातीत रिटेल ट्रेडर्सच भाग जवळपास 17 अब्ज डॉलर इतका आहे. ज्यात खेळणी, घरातील वस्तू, मोबाईल, इलेक्ट्रिक सामान आणि कॉस्मॅटिक उत्पादनांचा समावेश आहे. चीनमधून वस्तूंच्या आयातीवर बंदी घातल्यानंतर अर्थातच ‘मेड इन इंडिया’ म्हणजेच भारतीय कंपन्यांना सुगीचे दिवस येणार आहेत.